लोकसभा निवडणुकीमुळे के-सीईटी निकालाला विलंब?
4 जूननंतर निकाल जाहीर होण्याची शक्यता
बेळगाव : के-सीईटी परीक्षा होऊन महिना होत आला तरी अद्याप निकाल देण्यासाठी विलंब होत आहे. इंजिनिअरिंगसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा महत्त्वाची असते. त्यामुळे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, अद्याप बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल लागला नसल्याने लोकसभा निवडणूक निकालानंतरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. बेळगावसह संपूर्ण राज्यात 18 व 19 एप्रिलला सीईटी परीक्षा घेण्यात आली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 17 हजार 963 विद्यार्थ्यांनी के-सीईटी परीक्षा दिली. अभियांत्रिकीसह पॅरामेडिकल तसेच इतर अभ्यासक्रमांसाठी सीईटी उत्तीर्ण असणे सक्तीचे करण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून परीक्षेची तयारी केली होती. परीक्षा होऊन एक महिना होत आला तरी अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. सीईटी परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण अवलंबून असल्याने निकाल केव्हा लागणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतरच 5 किंवा 6 जून रोजी के-सीईटीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांना अजून 15 दिवस तरी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बारावी पुरवणी परीक्षेनंतर...
नुकत्याच घेण्यात आलेल्या बारावी पुरवणी परीक्षेची पेपर तपासणी पूर्ण झाली. मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन गुण भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी अथवा पुढील आठवड्यात बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतरच सीईटीचा निकाल लागणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.