आंघोळीसाठी विहीरीत मारलेली उडी ठरली शेवटची! सावरवाडी येथील दुर्दैवी घटनेत वृद्धाचा मृत्यू
कसबा बीड
सावरवाडी ता. करवीर येथे आज सकाळी पांडुरंग राऊ कंदले (ढोणेवाडी) वय ७० आंघोळीला गेले होते. त्यांचा गाळात रुतून मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सावरवाडीत पांडूरंग कंदले हे नेहमीप्रमाणे अंघोळीला जायचे. पण बराचवेळ आंघोळीला गेलेले कंदले न आल्याने नातवंडे विहिरीवर गेली. विहिरीच्या काठावर चप्पल कपडे आढळून आले . पण आजोबा न दिसल्याने मुलांनी शोधाशोध केली . शेवटी नातवाने विहीरीत उडी घेतली व तेव्हा पांडूरंग कंदले हे खाली गाळात रुतले आहे हे लक्षात घेऊन त्यांना विहिरीच्या तळातून बाहेर काढले .पण नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्यू झाला होता. नेहमीच विहिरीवर अंघोळीला जायचे पण आजची उडी, आणि अंघोळ शेवटचीच ठरली अशी कुजबूज होती.
मनमिळावू,हळवा स्वभाव असणारे पांडुरंग हे गरीब शेतकरी व कर्ता पुरुष होते.अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण कंदले परिवार, नातेवाईक यांच्यावर शोककळा पसरली. या घटनेची पोलिस पाटील पंढरीनाथ ताशिलदार यांनी करवीर पोलिस ठाण्यात वर्दी दिली. पुढील तपासासाठी कोल्हापूर येथील सीपीआर, जिल्हा शल्यचिकित्सक विभागात मृतदेह नेण्यात आला. या घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राहुल देसाई व प्रशांत पाटील हे करत आहेत.