चिनाबमध्ये उडी, पाकिस्तानात मिळाला मृतदेह
कुटुंबीयांचे पंतप्रधान मोदींना आवाहन/ वृत्तसंस्था
जम्मू
चिनाब नदीत उडी घेत एका युवकाने आत्महत्या केली आहे. आता त्याचा मृतदेह पाकिस्तानात सापडला असल्याचे कळताच युवकाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी आता युवकाचा मृतदेह मिळवून देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे.
पाकिस्तानात मृतदेह सापडल्यावर युवकाच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. अखनूर सेक्टरच्या एका सीमावर्ती गावचा रहिवासी असलेला हर्ष नागोत्रा 11 जून रोजी बेपत्ता झाला होता आणि त्याची दुचाकी नदीच्या काठावरून हस्तगत करण्यात आली होती.
नागोत्राच्या कुटुंबीयांनी हर्ष बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. प्रारंभिक तपासानंतर ऑनलाईन गेमिंग अॅप्समुळे 80 हजार रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झेलल्यावर हर्षने नदीत उडी घेत आत्महत्या केली असावी असा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला होता.
हर्षच्या व्हॉट्सअॅप अकौंटवर पाकिस्तानी अधिकाऱ्याचा मेसेज आला, ज्यानंतर हर्षच्या मृत्यूची पुष्टी झाली होती. पोस्टमार्टम विभागात तैनात असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्याने व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे मृतदेह 13 जून पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सियालकोटमध्ये एका कालव्यात हस्तगत झाल्याचे कळविले अशी माहिती हर्षचे वडिल सुभाष शर्मा यांनी दिली आहे.
अधिकाऱ्याने मृत हर्षच्या वडिलांना मृतदेह दफन करण्यात आल्याचे कळविले होते. तसेच पाकिस्तानी अधिकाऱ्याने शोकाकुल कुटुंबाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हर्षचे ओळखपत्रही शेअर पेले, ज्यामुळे सियालकोटमध्ये हस्तगत मृतदेह आपल्याच बेपत्ताच मुलाचा असल्याची पुष्टी शर्मा यांनी केली. अंत्यसंस्कारासाठी माझ्या मुलाचा मृतदेह परत आणण्यास मदत करा अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करत आहे. आम्ही त्याच्यावर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करू इच्छितो असे शर्मा यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी हर्षच्या कुटुंबीयांनी विदेश मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देखील मृतदेह सोपविण्याचे आवाहन केले आहे.