हाथरस दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी
बळींची संख्या वाढण्याची भीती, अनेक कारणांची चर्चा, सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर
► वृत्तसंस्था / हाथरस
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी न्यायालयीन चौकशीचा आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिला आहे. या प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीत व्हावी अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयातील सादर करण्यात आली आहे. ही गंभीर दुर्घटना घडली कशी, यासंबंधी बऱ्याच उलटसुलट चर्चांना सध्या ऊत आला आहे.
दुर्घटनेतील मृतांमध्ये बव्हंशी महिला अणि मुलांचा समावेश आहे. निवृत्त न्यायाधीशांकडून या घटनेची चौकशी केली जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी बुधवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या भीषण घटनेला कारणीभूत असणाऱ्यांचा शोध घेतला जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी मृत आणि जखमींच्या नातेवाईकांना दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका
या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत व्हावी आणि ती तज्ञांच्या समितीकडून केली जावी, अशी मागणी करणारी याचिका विशाल तिवारी या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. या घटनेचा अहवाल सादर करण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारला द्यावा आणि हलगर्जीपणा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा आदेश द्यावा, अशीही मागणी याचिकेत आहे. जखमींवर उपचार कशा प्रकारे सुरु आहेत याचीही माहिती सादर करण्याचा आदेश देण्यात यावा, असे याचिकेत सुचविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दिशानिर्देश द्या
अशा भीषण घटना भविष्यकाळात घडू नयेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिशानिर्देश द्यावेत आणि मार्गदर्शक तत्वे आखून द्यावीत, अशी विनंती न्यायालयाला या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ही याचिका न्यायालय केव्हा विचारार्थ घेणार, यासंबंधी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, दुर्घटनेचे गांभीर्य पाहता लवकरात लवकर याचिकेची सुनावणी व्हावी, अशी मागणी आहे.
अनेक कारणांची चर्चा
ही दुर्घटना कशी घडली, यासंबंधी अनेक कारणे समोर येत असून सध्या त्यांची चर्चा होत आहे. कार्यक्रमासाठी 80 हजार भाविकांना अनुमती होती. तथापि, प्रत्यक्षात अडीच लाख भाविक उपस्थित होते. त्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचे हाथरस पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच कार्यक्रमाच्या स्थानी जाण्यासाठी आणि तेथून परतण्यासाठी असणारा मार्ग अरुंद होता. पावसामुळे या मार्गावर चिखल पसरल्याने निसरडे झाले होते. या चिखलात घसरुन अनेक भाविक खाली पडले.
चरणधूळ घेण्यासाठी झुंबड
या सत्संग कार्यक्रमाचे मुख्य धर्मगुरु साकार विश्वहरी बाबा यांचे प्रवचन झाल्यानंतर त्यांची चरणधूळ घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. या गोंधळात काही महिला एकमेकींच्या अंगावर पडल्या. त्यातून चेंगराचेंगरीला प्रारंभ झाला. हजारो भाविकांनी एकाचवेळी घटनास्थानातून बाहेर पडण्याची धडपड चालविल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, असेही कारण देण्यात येत आहे.
खाली पडलेल्यांचा मृत्यू
चेंगराचेंगरी सुरु झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी भाविकांची एकच गडबड उडाली. त्यामुळे अनेक महिलांना आणि बालकांना तोल सावरता न आल्याने त्या खाली पडल्या. त्यांच्या अंगावरुन लोक पळत सुटल्याने लोकांच्या पायाखाली चिरडून अनके महिला मृत्युमुखी पडल्या. तसेच गर्दीमुळे अनेक लोकांचा श्वास कोंडल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती अनेक प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
वैद्यकीय साहाय्यता अपुरी
अनेकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा श्वास सुरु होता. तथापि, रुग्णालयात उपचार व्यवस्था अपुरी होती आणि डॉक्टरांची संख्याही अत्यल्प होती. परिणामी अनेक जखमींचा मृत्यू वेळेवर पुरेसे उपचार न मिळाल्याने झाला, असाही आरोप करण्यात येत आहे. तथापि, या माहितीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. अनेक जखमींवर प्रथमोपचार करुन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बाबांच्या सेवादारांची अरेरावी?
सत्संग कार्यक्रम झाल्यानंतर प्रथम साकार बाबांना बाहेर नेण्याचा आग्रह त्यांच्या सेवादारांनी धरला. भाविकांना आधी बाहेर पडू द्यावे, अशी मागणी काही जणांनी केली. तथापि तिच्याकडे बाबांच्या सेवादारांनी दुर्लक्ष केले. काही सेवादारांनी बाबांच्या जवळ आलेल्या भाविकांना धक्के देऊन ढकलले. त्यामुळे ते जमिनीवर पडले आणि चेंगराचेंगरीला प्रारंभ झाला, अशीही चर्चा आहे. लोकांना आधी बाहेर जाऊ देण्यात आले असते, तर दुर्घटनेची तीव्रता बरीच कमी झाली असती, असेही काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र, दुर्घटनेचे खरे कारण चौकशी झाल्यानंतरच समोर येईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. चौकशी लवकरात लवकर आणि सर्वंकष व्हावी, अशी मागणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाविकांनी केली आहे.
बाबा बेपत्ता
दुर्घटना घडल्यानंतर साकार विश्वहरी बाबा हे बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या दुर्घटनेप्रकरणी एफआयआर सादर करण्यात आला असून त्याच्यात बाबांचे नाव नसल्याची माहिती आहे. मात्र, बाबा सापडल्यावर त्यांचीही चौकशी केली जाईल आणि आवश्यकता निर्माण झाल्यास त्यांच्यावर गुन्हा सादर केला जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
साहाय्यता कार्य वेगाने
दुर्घटना घडल्याचे वृत्त कळताच उत्तर प्रदेश सरकारच्या आपत्कालीन साहाय्यता विभागाने त्वरेने हालचाली केल्या. गर्दीवर नियंत्रण आणण्यात आले आणि जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. अनेक जखमींना आग्रा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. यामुळे अनेक जखमींचे प्राण वाचले अशी माहिती हाथरस आणि आग्रा येथील प्रशासनाने दिली आहे. आपत्कालीन साहाय्यता दलाचे 1000 कर्मचारी कार्यरत घटनास्थळी कार्यरत होते.
हाथरस दुर्घटना चौकशी लवकरच
ड उत्तर प्रदेश सरकारकडून चौकशीला प्रारंभ, दोषींवर कारवाई होणार
ड सत्संग कार्यक्रमातील कुव्यवस्थापनामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप
ड त्वरीत साहाय्यता कार्य प्रारंभ केल्याने अनेकांचे प्राण वाचल्याचे स्पष्ट