जोशीमठ-बद्रीनाथ महामार्ग बंद
उत्तराखंडमधील पाताळगंगा लांगसी बोगद्यावर कोसळला डोंगर
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पुरामुळे परिस्थिती बिकट आहे. बुधवारी राज्यातील चमोली जिह्यातील पाताळगंगा लांगसी बोगद्यावर डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्याचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओही समोर आला आहे. बोगद्याजवळील रस्त्यावर दगड-मातीचा ढिगारा पडल्याने जोशीमठ-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हल्दवानी, बनबासा, टनकपूर, सितारगंज आणि खातिमा येथील परिस्थिती फारच बिघडली आहे. भूस्खलनामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि 200 हून अधिक ग्रामीण रस्ते अजूनही बंद असल्याचे राज्य आपत्कालीन यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे देशातील अनेक भागात परिस्थिती बिकट झाली आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम असून दिल्लीसह उत्तरेकडील इतर राज्यांमध्ये पावसाचे सत्र सुरू आहे. हवामान खात्याने अऊणाचल प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगालसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नद्या दुथडी भरून वाहू लागल्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे.
आसाममधील पुराचा विळखाही कायम आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांची पाण्याची पातळी धोक्मयाच्या पातळीच्या खाली गेली आहे. राज्यातील पूरस्थितीत किंचित सुधारणा झाली असून 26 जिह्यांतील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या सुमारे 17.17 लाखांवर आली आहे. मंगळवारी 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून पूर आणि पावसात आतापर्यंत 92 जणांना जीव गमवावा लागला आहे. बिहारमध्ये गंडक, कोसी, बागमती, कमला यासह अनेक नद्यांना उधाण आले आहे. त्यामुळे गोपालगंज, बेतिया आणि बगाहामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत वीज पडून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत.
हवामान खात्याने बिहार, आसाम, मेघालय आणि गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्मयता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये यलो अलर्ट आहे. या राज्यांमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.