जीजाकी नझर, सालेसाहब क्या करेंगे !
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांचे मेहुणे रॉबर्ट वाड्रा यांच्यावर तिरकस टिप्पणी केली आहे. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. गांधी यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही उमेदवारी दिल्याने तेथून ते लोकसभा सदस्य होऊ शकले होते. यावेळी गांधींनी अद्याप अमेठी मतदारसंघातून उमेदवारी सादर केलेली नाही. ते केवळ वायनाडमधूनच लढत आहेत. अमेठीच्या उमेदवारीसाठी वाड्रा aयांनी इच्छा दर्शविली होती.
तथापि, वायनाडमध्ये यंदा डाव्या आघाडीने तगडी महिला उमेदवार गांधी यांच्या विरोधात दिली आहे. त्यामुळे गांधी यांना विजय सहजसाध्य नाही, असे चित्र आहे. त्यामुळे ते अमेठीतूनही अर्ज सादर करतील अशी चर्चा केली जात आहे. अमेठीत निवडणूक उशीरा असल्याने त्यांना केरळच्या निवडणुकीनंतर अमेठीत अर्ज सादर करणे शक्य होणार आहे. वायनाडमध्ये विजयाची शाश्वती नाही असे दिसल्यास ते पुन्हा अमेठीकडे वळणे शक्य आहेत. तथापि, अमेठीत त्यांचेच मेहुणे रॉबर्ट वाड्राही इच्छुक असल्याने उमेदवार म्हणून कोणाची निवड केली जाणार हा प्रश्न आहे.
इराणींचा टोला
याच परिस्थितीला अनुसरुन स्मृती इराणी यांनी ‘जीजेकी नझर, अब सालेसाहब क्या करेंगे“ असा टोला त्यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी लगावला. अमेठीत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 5 मे या दिवशी मतदान होत आहे. आता मतदानाला केवळ 26 दिवस उरलेले असतानाही काँग्रेसने अद्याप या मतदारसंघात उमेदवार घोषित केलेला नाही. वायनाडचा रागरंग पाहून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे दिसते. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या या धोरणावर टीका केली आहे.