जेबीकेएसएस लढविणार झारखंड विधानसभा निवडणूक
वृत्तसंस्था/ रांची
लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये प्रभाव दाखवून दिलेला नवा स्थानिक पक्ष झारखंड भाषा खतियान संघर्ष समितीचे (जेबीकेएसएस) अध्यक्ष जयराम महतो यांनी राज्यातील विधानसभेच्या 55 जागा स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षाला 8.5 लाख मते मिळाली आहेत. आमचा पक्ष केवळ एक वर्ष जुना असून आम्ही पैसे खर्च न करता निवडणूक लढविली होती. आमच्याकडे बूथ व्यवस्थापनासाठी देखील पैसे नव्हते. आमच्या पक्षाला पूर्ण समाजाचे समर्थन मिळाले असल्याचा दावा महतो यांनी केला आहे.
महतो यांनी यावेळी केंद्र सरकारला नीटच्या आयोजनातील त्रुटी दूर करण्याचे आवाहन केले आहे. युवांना रोजगार, नियमित आणि गैरप्रकार रहित भरती परीक्षा हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. निवडणूक आयोगाकडून 15 दिवसांच्या आत आमच्या पक्षाला चिन्ह प्राप्त होणार असल्याचे महतो यांनी सांगितले आहे.