जयललितांची कोट्यावधींची मालमत्ता तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द
बेंगळूरमधील विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही
प्रतिनिधी/ बेंगळूर
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मालमत्तेची कागदपत्रे, जवळपास 27 किलो सोन्याचे दागिने, सोन्याच्या वस्तू, 11,344 रेशमी साड्या, मौल्यवान घड्याळे आणि इतर किमती वस्तू तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता व इतर आरोपींना बेंगळूरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले होते. सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश उचलून धरला होता. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या जयललिता यांच्याशी संबंधित 27 किलो वजनाचे 1,606 प्रकारच्या सोन्याच्या वस्तू, सोने-हिऱ्यांचे दागिने, 700 किलो चांदीचे दागिने व वस्तू, 2,20,384 रुपये मूल्य असणाऱ्या जुन्या नोटा, 11,344 रेशमी साड्या, 250 शाल, 12 रेफ्रिजरेटर, 10 टीव्ही संच, 8 व्हीसीआर, 1 ^व्हिडीओ कॅमेरा, 4 सीडी प्लेअर, 2 ऑडिओ डेक, 24 टू इन वन टेपरेकॉर्डर, 1,040 व्हिडिओ कॅसेट्स, 3 लोखंडी लॉकर तामिळनाडू सरकारच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. तसेच 10.18 कोटी रुपयांच्या बँक ठेवी, तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात असणारी ऐशोआरामी बस व इतर मालमत्तांचा लिलाव करण्याची सूचना आता बेंगळूरमधील विशेष न्यायालयाने दिली आहे. शनिवारी गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी न्यायाधीशांच्या उपस्थितीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात या सर्व वस्तू तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द केल्या. यात सोन्याचे किरीट, सोन्याचा कमरपट्टा, सोन्याची तलवार, 1.2 किलो वजनाचा हार, घड्याळे, हिऱ्यांचे दागिने यांचाही समावेश आहे.
तामिळनाडूच्या चेन्नई, तंजावर, चेंगलपट्टू, कांचीपूर, तिरुवल्लूर, तिरुवरूर, तुतुकुडी येथील 1,526 एकर जमीन लिलाव करण्याऐवजी सार्वजनिक कामांसाठी वापरण्याचा सल्ला न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिला आहे. सोने रिझर्व्ह बँकेला विकून मिळालेला पैसा जनतेसाठी वापरण्याची सूचना दिली आहे. लिलावातून मिळालेला पैसा ग्रामीण पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला आहे, असे न्यायमूर्ती एच. ए. मोहन यांनी सांगितले आहे.