महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जनार्दनस्वामिनी ग्रंथाला पारमार्थिक रूप प्राप्त करून दिले

06:30 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज एकादश स्कंधाचे महात्म्य सांगून झाल्यावर अत्यंत विनयाने सद्गुरूंनी हा ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतला असं सांगून त्यांचे ऋण व्यक्त करतात. ते म्हणतात, एकादश स्कंधावरील टीका सद्गुरु जनार्दन महाराजांनी माझ्याकडून लिहून घेतली ती केवळ भाविकांना त्याचं फल मिळावं म्हणून. ग्रंथ कसा समजावून सांगावा, त्यांची मांडणी कशी करावी, इत्यादि गोष्टीबद्दल मी अज्ञानी होतो हे जाणून त्यांनी मार्गदर्शन करून हा ग्रंथ लिहून घेतला. हे जनार्दन स्वामिनी घडवून आणलेले एक आश्चर्य होय. त्यांनी ग्रंथाला पारमार्थिक रूप प्राप्त करून दिले. त्यासाठी जनार्दनस्वामिनी आधी माझे मी पण नाहीसे केले आणि मग माझ्याकडून पारमार्थिक निरुपण लिहून घेतले. जरी लेखक म्हणून माझ्या नावे हा ग्रंथ ओळखला जात असला तरी हा ग्रंथ ही त्यांचीच निर्मिती आहे. सुरवातीला ग्रंथ पाहून लोक म्हणतील एकनाथ ना, अतिशय ज्ञानी मनुष्य आहे पण जे सज्ञान ग्रंथ जवळून पाहतील तेव्हा म्हणतील हे तर श्री जनार्दन महाराजांचे काम आहे. ग्रंथ बघून गैरसमज झालेले वाचक मला थोर भक्त म्हणतील, कुणी जीवनमुक्त समजतील परंतु प्रत्यक्षात मला आसने, ध्यान, मंत्र, मुद्रा, माळा जपणे, उपासकलक्षण ह्यातलं काहीच कळत नाही. ग्रंथ बघून भुललेले भाविक हा एकनाथ कोणता मंत्र देत असेल, काय उपदेश करत असेल हे कुणाला कळू देत नाही असे म्हणतील पण प्रत्यक्षात मी कुणाला मंत्रही देत नाही व कुणाला काही उपदेशही करत नाही, हे लक्षात आल्यावर तेच लोक मला नावे ठेवण्याच्या उद्देशाने म्हणतील की, नुसत्या हरिनामाचा घोष करून हा लोकांना भुलवत असतो. गंमत म्हणजे असे अनेक तर्कवितर्क सद्गुरू जनार्दन महाराज लोकांच्या मनात स्वत:च निर्माण करत असतात. त्या तर्कवितर्काला धरून लोक मला त्याबद्दल जाब विचारतात पण मी त्यावेळी निश्चिंत असतो कारण लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वत: श्री जनार्दन महाराजच माझ्या मुखातून देत असतात. युक्तीप्रयुक्तीने ते लोकांचे समाधान करतात. हे सर्व ते माझ्यासाठी करतात कारण त्यांनी माझे मी पण ह्याआधीच हिरावून घेतलेले आहे. आता माझ्या इच्छेनुसार मी माझा अंगठासुद्धा हलवू शकत नाही. माझ्या देहाच्या सर्व क्रियासुद्धा तेच घडवून आणतात. आपले आयुष्य सद्गुरुंनी कसे व्यापून टाकले आहे हे सांगताना पुढे नाथमहाराज म्हणतात, मिनिटामिनिटागणिक होणाऱ्या माझ्या हालचाली, माझे होणारे श्वासोच्छ्वास, माझ्या इंद्रियांचे व्यापार हे सर्व त्यांच्या इच्छेनुसार चालू असतात. मी एखादी कविता म्हंटली की, ती प्रत्यक्षात स्वामीच माझ्या मुखातून म्हणत असतात. मी किंवा माझे हा विचारच आता माझ्या मनात येत नाही इतके माझे मन त्यांनी पराकोटीचे निर्विचार केलेले आहे. अशा पद्धतीने माझ्या संपूर्ण देहावर नियंत्रण मिळवून श्री जनार्दनस्वामिनी ही ग्रंथरचना करवून घेतली आहे. अर्थात हे जे काही मी सांगतो आहे हे त्यांचेच सांगणे आहे, हे वाचकांनी ओळखले असेलच. ते आणि मी केवळ दिसायला दोन आहोत पण मी त्यांच्यातच विरघळून गेलेलो असल्याने जनार्दन स्वामी हेच काय ते एकमेव अस्तित्वात आहेत आणि त्यांनीच हा परिपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. मूळ भागवत ग्रंथ हा संस्कृतमध्ये असला तरी हा ग्रंथ मराठीत का लिहिला असा प्रश्न विचारून बऱ्याच पंडितांनी त्याला आक्षेप घेतला होता. त्या आक्षेपाला उत्तर देताना नाथमहाराज म्हणतात, हा ग्रंथ देवभाषा संस्कृतमधून न लिहिता देशी भाषेत म्हणजे मराठीत लिहिला आहे म्हणून पंडितांनी त्यांची उपेक्षा करू नये. ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनाही भगवंतांनी उद्धवाला केलेला उपदेश समजावा आणि त्यानुसार वागल्यामुळे त्यांचाही उद्धार व्हावा ह्या उद्देशाने जनार्दनस्वामिनी हा ग्रंथ मराठीत लिहून घेतला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article