For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू-काश्मीरला देणार पूर्ण राज्याचा दर्जा!

06:55 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरला देणार पूर्ण राज्याचा दर्जा
Advertisement

पंतप्रधानांची उधमपूरमध्ये घोषणा : लवकरच विधानसभा निवडणुका घेण्याचेही आश्वासन

Advertisement

वृत्तसंस्था/ उधमपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचारासाठी जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा प्रचार केला. यादरम्यान त्यांनी एका जाहीर सभेलाही संबोधित करताना जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचा दिवस दूर नाही. विधानसभा निवडणुकांनंतर प्रत्येकजण आपापल्या मंत्री आणि आमदारांकडे लवकरच जाऊ शकतील. तुम्ही लोकांनी खूप त्रास सहन केला आहे, मी तुमच्यासाठी एक मोठे स्वप्न पाहिले आहे. त्यानुसार विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आम्ही जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करू, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच आताची लोकसभा निवडणूक केवळ खासदार निवडण्यासाठी नाही, तर ती देशात मजबूत सरकार बनवण्यासाठी असल्याचे सांगत भाजप आणि रालोआच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

2014 मध्ये मी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलो असताना याच भूमीवर मी तुम्हाला जम्मू-काश्मीरच्या अनेक पिढ्यांनी जे त्रास सहन केले त्यापासून मी तुम्हाला मुक्त करेन, अशी हमी दिली होती. आज तुमच्या आशीर्वादाने मी ती हमी पूर्ण केली आहे, असेही मोदी आपल्या भाषणात म्हणाले. ‘मी गेल्या अनेक दशकांपासून उधमपूरला येत आहे. गेल्या 5 दशकांपासून जम्मू काश्मीरच्या भूमीवर माझे दौरे सुरू आहेत. 1992 मध्ये एकता यात्रेदरम्यान तुम्ही येथे केलेले भव्य स्वागत आणि आदर मला आठवतो. त्यावेळी लाल चौकात तिरंगा फडकवण्याचे आमचे ध्येय होते, त्यावेळी माता-भगिनींनी खूप आशीर्वाद दिले होते, याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली.

काश्मीरमध्ये आता बरेच बदल झालेले आहेत. दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, बंद, स्ट्राईक, सीमेपलीकडून गोळीबार हे येथे आता निवडणुकीचे मुद्दे राहिलेले नाहीत. त्यावेळी माता वैष्णोदेवी यात्रा किंवा अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे कशी पार पाडायची, याची चिंता होती. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत आहे आणि विश्वासही वाढत आहे. म्हणूनच आज जम्मू-काश्मीरच्या कानाकोपऱ्यातून ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’चा आवाज बुलंद होत असल्याचे मोदी म्हणाले.

Advertisement
Tags :

.