कुद्रेमनी गावात जलजीवन मिशन योजनेचे काम अंतिम टप्प्यात
घरोघरी नळपाणी योजनेचे उद्दिष्ट, ग्रामस्थांत समाधान
वार्ताहर /कुद्रेमनी
राज्य व केंद्र शासनाच्यावतीने गावातील नागरिकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी कुद्रेमनी गावात जलजीवन मिशन योजना कार्यान्वित झाली आहे. गावच्या विविध गल्ल्यांमध्ये जेसीबीच्या साहाय्याने चरी खोदाई करून पाणी वाहतुकीसाठी मोठ्या व लहान पाईप घालून घरोघरी पाईप जोडणीचे काम सुरू आहे. दोन कोटी चाळीस लाख रुपये निधीची ही योजना आहे. गावातील नाईकवाडा गल्ली, अॅप्रोच रस्ता वसाहत, टिळकवाडी गल्ली क्र. 1 व 2, गुरवनगर, साईनगर, हनुमाननगर, मठ गल्ली, रवळनाथ नगर, सरदारनगर, आंबेडकरनगर आदी भागात पाईपलाईन जोडणी झाली असून गावातील मारुती गल्ली, चव्हाट गल्ली, शिवाजी रोड, लक्ष्मी गल्ली भागात ही योजना कार्यान्वित होणार आहे. याबाबत ग्रा. पं. अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, पाणी व्यवस्थेसाठी गावच्या गावडेवेस भागात सिमेंट काँक्रिटीकरण केलेली पाण्याची विहीर असून या ठिकाणाहून प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणात सिमेंट काँक्रिटची मोठी टाकी बांधण्यात येत आहे. या टाकीतून फिल्टर पाणी मोठ्या जलकुंभात टाकून तेथून सर्व गावभर पाणी वितरण होणार आहे. सध्या गावातील रस्त्यांवर चरी खोदाईचे काम सुरू आहे. नागरिकांकडून यासाठी चांगले सहकार्य मिळत आहे. यामुळे गावातील प्रत्येक घरोघरी नागरिकांना पाणी मिळणार असल्याने पाणी समस्या दूर होणार आहे. या योजनेमुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले आहे.