जय जय महाराष्ट्र माझा
आज संपूर्ण विश्वात कामगार दिन आणि महाराष्ट्रात कामगार दिनासोबत महाराष्ट्र दिन साजरा होतो आहे. आज सार्वजनिक सुट्टी आहे. राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन मुंबईत ध्वजारोहण करतील, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गायले जाईल. पोलिस संचलन व मानवंदना होईल. काही पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल या मुख्य कार्यक्रमासोबत राज्यभर महाराष्ट्र दिनाचे, कामगार दिनाचे असंख्य कार्यक्रम होतील व उत्साहाला, आनंदाला भरती येईल. यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे खास वैशिष्ट्या म्हणजे मराठी भाषेला मिळालेला राज्य भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा आणि महाराष्ट्रात शालेय शिक्षणात हिंदीची सक्ती केल्याने उठलेले वादळ. खरं तर निवडणुकीत कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल व जाहिरात मोहीम चालवली जात होती आणि आजही महाराष्ट्र अनेक बाबतीत अव्वल असला तरी महाराष्ट्रापुढे अनेक मुलभूत प्रश्न आ वासून उभे आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे सरकारने आणि जनतेने देणे गरजेचे आहे. देशभर काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या 26 पर्यटकांच्या हत्या हा संतापाचा व निषेधाचा विषय आहे. भारत-पाकिस्तान युध्द होणार असे वाहिन्यांनी वातावरण केले आहे. सरकारला या दहशतवादी हल्याविरोधात सर्व निर्णय घेणेस भारतातील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. देशहितासाठी आम्ही सारे एक अशी भूमिका आहे आणि ती योग्य व भारताची संघटित शक्ती दर्शवणारी आहे. तशी परंपराही आहे. अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षाचे खासदार होते पण काँग्रेस सरकारने त्यांना चर्चेसाठी पाठवले होते. इंदिरा गांधींनी पाकिस्तानशी युद्ध करुन पाकिस्तानचे दोन तुकडे केले, सिमला करार केला. सुमारे दीड लाख पाकिस्तानी सैनिकांना माफीनामा लिहून मुक्त केले हा आपला इतिहास आहे. मोदी सरकार सत्तारूढ झाल्यावर सर्व जगाला कल्पना आली. भारत आता पहिल्यासारखा राहिला नाही. जशास तसे उत्तर देतो आणि केलेली कुरघोडी व्याजासह परत करतो. सर्जिकल स्ट्राईक असो, कसाबला फाशी असो किंवा देशहिताआड कुणीही आला तरी त्याला धडा शिकविण्यासाठीची कारवाई असो. मोदी मागे सरकत नाहीत, तडजोड करत नाहीत. मोदींनी सिंधू करार रद्द करुन आणि अचानक झेलम नदीत पाणी सोडत पाकिस्तानात पूर स्थिती निर्माण करत धक्का दिला आहे. व्यापार बंद केला आहे. सीमा बंद केल्या आहेत आणि पाकिस्तानी नागरिक व दूतावासमधील कर्मचारी यांना एक मे पर्यंत भारत सोडा असे फर्मान काढले आहे. मोदी व शहा यांच्या मनात, योजनेत काय आहे याचा कुणालाच पत्ता नाही पण घुसून मारणार कल्पनेपेक्षा कठोर शासन देणार असे म्हटले गेले आहे. एक मे नंतर याला गती येईल अशी अपेक्षा आहे. देशभर ‘एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो’ चा नारा आहे. पाकव्याप्त काश्मीर जिंकून उर्वरित पाकिस्तानचे आणखी तीन तुकडे पडले तर आश्चर्य वाटायला नको. कामगारांनी कामाचे आठ तास आणि एक महिन्याचा हक्काचा बोनस लढा देऊन मिळवला. त्यामुळे जागतिक पातळीवर एक मे कामगार दिन साजरा करतात. पूर्वी कामगारांना आठवड्याला पगार दिला जाई. वर्षाचे बावन्न आठवडे पगार मिळे, नंतरच्या काळात पगार महिन्याला सुरु झाला आणि कामगारांना बारा महिन्यांचा पगार म्हणजे 48 आठवड्यांचा पगार दिला जाऊ लागला. उर्वरित चार आठवड्यांचा पगार बोनस म्हणून दिला पाहिजे ही मेहरबानी नाही हक्क आहे असे ठरले तो दिवस म्हणून कामगार दिनाला महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्याची एक मे 1960 रोजी 105 हुतात्म्यांचा बळी घेऊन निर्मिती झाली. मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. मराठी भाषिकांचे राज्य झाले पण ते पूर्ण नव्हते. बेळगाव, कारवार, निपाणी भालकीसह महाराष्ट्र ही मागणी आजही कायम आहे. सीमा प्रश्नावर अनेक आंदोलने झाली, ठराव झाले, अनेकांचा बळी गेला पण ही मागणी हेतूपूर्वक दुर्लक्षली गेली. महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल ही राज्ये स्वातंत्र्य चळवळीत लढाऊ व अग्रेसर होती. ती एकसंघ राहणार नाहीत, स्थानिक वादात अडकतील व आपणास दिल्लीचे राज्य राखता येईल असे सुप्त राजकारण त्यामागे होते. त्यामुळे मराठी व कोकणी भाषिकांचे अखंड राज्य होऊ दिले गेले नाही हे राजकारण समजून घेतले पाहिजे. गुजरात स्वतंत्र झाला पण आज 65 वर्षे झाली तरीही अखंड मराठी भाषिक राज्य झाले नाही की महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नाही. आज महाराष्ट्र दिनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची व मराठी हितासाठी वज्रमूठ बांधण्याची गरज आहे. मराठीला राजभाषेचा व अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद आहे पण मराठी शाळा बंद पडत आहेत. शिक्षक भरतीचे दर ठरलेले आहेत. बोगस शाळा, बोगस शिक्षक, लाच खाऊ शिक्षण अधिकारी आणि खाजगी शिकवण्याचे पेव दुर्लक्षिता येत नाही. संस्था सम्राट, शिक्षण सम्राट यांचे पेव फुटले आहे. उत्तम लेखक, कवी, कथाकार, शाहीर, पत्रकार, साहित्यिक, लोक कलावंत यांना प्रतिष्ठा, सन्मान, संधी उरलेली नाही. आमच्या भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असे नवे ज्ञान ठाकरे बंधूंना झाले आहे. काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार अशीही चर्चा आहे पण या सर्व मंडळींनी खरंच महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हे बघितले पाहिजे. साधू संतांचा हा महाराष्ट्र कधी नव्हे इतका जातीयतेने पोखरला आहे. संत महापुरुष जातीय नेत्यांनी वाटून घेतले आहेत. कारस्थानाच्या आणि भ्रष्टाचाराच्या फायली जळतील अशा आगी लागत आहेत. भ्रष्टाचारी प्रतिष्ठीत बनून सरकारी तिजोरी हडप करत आहेत. मराठी भाषा, संस्कृती, परंपरा यांना नखे लावली जात आहेत व तोच शहाणपणा म्हणून मिरवला जातो आहे. कामगार क्षेत्रातही रोज बेरोजगारी वाढते आहे. कामगारांचे शोषण सुरुच आहे. राजकारण आणि राजकारण एवढाच उद्योग झाला आहे. त्यामध्ये शोधायलाही अपवाद नाहीत अशा या संधीकाळी महाराष्ट्राने जागे झाले पाहिजे आणि महाराष्ट्राला नवी दिशा, जाग आणली पाहिजे. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे खरेच आहे पण महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी कामगार, शेतकरी, महिला, युवक जसे एकत्र आले तसे ते पुन्हा एकत्र येण्याची व जातीपाती आणि भ्रष्टाचारी नाती फेकून आघाडीवरचा महाराष्ट्र नव्याने उभा करण्याची गरज आहे. महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !