देशाच्या इच्छेनुसारच घडणार!
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा : सुरक्षेची जबाबदारी माझी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवारी दिल्लीच्या बक्करवाला आनंद धाम आश्रममध्ये सनातन संस्कृती जागरण महोत्सवात सामील झाले. या महोत्सवाच्या व्यासपीठावरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला इशारा दिला आहे. स्वत:च्या सैनिकांसोबत मिळून देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे एक संरक्षणमंत्री म्हणून माझे दायित्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळत देशाची जशी इच्छा आहे तसेच घडणार असे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
देशाच्या दिशेने डोळे वटारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणे हे माझे दायित्व आहे आणि देशातील जनता पंतप्रधान मोदींना चांगल्याप्रकारे ओळखते. त्यांच्या कार्यशैलीबद्दल सर्वजण जाणून आहेत. जोखीम पत्करण्याची त्यांची तयारी देखील सर्वांना ठाऊक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची जनता जी इच्छा बाळगून आहे, तसेच घडत आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला म्हणजे पाकिस्तानचे भ्याड कृत्य आहे आणि देश या हल्ल्याला कधीच विसरणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींनी भारताला 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र करण्याचे लक्ष्य आम्हा सर्व देशवासीयांसमोर ठेवले आहे. स्वाभाविकपणे हे लक्ष्य काही छोटे नाही, परंतु हे लक्ष्य निश्चितच पूर्ण होणार आहे. आंतरराष्ट्रीय जगतात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे हे सत्य सर्वजण स्वीकारतील. पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे म्हणणे गांभीर्याने ऐकले जात नव्हते. परंतु आता भारत काय म्हणतोय हे पूर्ण जग लक्षपूर्वक ऐकत असते असा दावा राजनाथ सिंह यांनी केला.
भारताचे सामर्थ्य केवळ सशस्त्र दलांमध्ये नसून संस्कृती आणि अध्यात्मिकतेतही अंतर्भूत आहे. आमचे शूर सैनिक भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करतात. तर आमचे संत आणि ऋषी देशाच्या अध्यात्मिकतेला संरक्षित करतात. एकीकडे सैनिक रणभूमीत लढतात, तर दुसरीकडे संत जीवनभूमीवर संघर्ष करतात. हा देश तपस्या करणेही जाणतो आणि आवश्यकता भासल्यास तलवार चालविणे देखील. आमच्या साधू-संतांनी वेळोवेळी योद्ध्यांप्रमाणे देश आणि धर्माचे रक्षण केले आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच भारताकडून सैन्य कारवाई केली जाऊ शकते असे मानले जात आहे. भारताकडून होणारी संभाव्य कारवाई पाहता पाकिस्तान धास्तावला आहे.