विराटच्या ‘आरसीबी’ला कमी लेखणे अयोग्य
महिला प्रीमियर लीग’ जेतेपदाच्या पार्श्वभूमीवर ‘आरसीबी’ कर्णधार स्मृती मानधनाने व्यक्त केलेले मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘आरसीबी’ने मिळविलेल्या महिला प्रीमियर लीग विजेतेपदाच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’ संघाने केलेल्या कामगिरीला कमी लेखणे योग्य नाही, असे मत ‘आरसीबी’च्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मानधनाने व्यक्त केले आहे.
मानधनाच्या नेतृत्वाखालील ‘आरसीबी’ने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षीच जेतेपद पटकावण्यात यश मिळविले आहे, तर कोहलीने जवळजवळ एक दशक नेतृत्व केलेल्या ‘आरसीबी’च्या पुरुष संघाला त्यांना 16 वर्षांच्या प्रवासात असे यश मिळालेले नाही. जेतेपद ही वेगळी गोष्ट आहे, पण कोहलीने भारतासाठी जे काही साध्य केले आहे ते उल्लेखनीय आहे. त्यामुळे माझी कारकीर्द कुठे आहे आणि त्याने आधीच काय साध्य केलेले आहे, त्याचा विचार करता यासंदर्भात तुलना मला योग्य वाटत नाही, असे मानधनाने मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मला तुलना न आवडण्याचे कारण म्हणजे त्याने जे काही साध्य केले आहे ते महान आहे. कोहली ही एक प्रेरणादायी व्यक्ती आहे. जेतेपद अनेक गोष्टी स्पष्ट करत नाही. आम्ही सर्व जण विराटचा आदर करतो आणि मला वाटते की, हा आदर कायम राहायला हवा’, असे भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार मानधना हिने म्हटले आहे.
मानधना आणि कोहली हे दोघेही 18 क्रमांकाची जर्सी परिधान करतात आणि डावखुरी फलंदाज असलेली मानधना त्यासंदर्भात बोलताना म्हणाली की, त्याच्या आधारे दोघांमध्ये तुलना करणे अवास्तव आहे. मी याला 18 क्रमांकाची तुलना म्हणणार नाही. जर्सी क्रमांक ही केवळ वैयक्तिक निवड आहे. माझी जन्मतारीख 18 आहे आणि माझ्या जर्सीच्या पाठीवर 18 क्रमांक असतो. विराट कसा खेळतो किंवा मी क्रिकेट कशी खेळते हे सदर क्रमांक ठरवत नाही. विराट कोहली हा आमच्यासाठी बऱ्याच बाबतीत प्रेरणास्थान आहे, असे ती म्हणाली.
मानधनाला वाटते की, ‘आरसीबी’चा पुरुष संघ नेहमीच चांगला स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला आहे, परंतु आयपीएल विजेतेपद त्यांच्यापासून दूरच राहिले. माझ्या मते, खरे सांगायचे तर, पुऊष संघही गेल्या 16 वर्षांत चांगले क्रिकेट खेळलेला आहे. ते चांगले खेळलेले नाहीत असे नव्हे. मला ही तुलना योग्य वाटत नाही. ‘आरसीबी’ ही एक ‘फ्रँचायझी’ आहे, त्यांच्या पुऊष आणि महिला संघांना स्वतंत्रपणे हाताळूया. कारण आम्हाला तुलना करून घ्यायची नाही. ते जे करतात त्यात ते चांगले आहेत. आम्ही जे करतो त्यात आम्ही चांगले आहोत, असे ती पुढे म्हणाली.