धर्माचे रक्षण करणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य
खानापूर येथील हिंदू धर्मसभेत धनंजय देसाई यांचे प्रतिपादन
खानापूर : धर्माचा सन्मान नेहमी जपला पाहिजे. धर्मराज्य सत्तेच्या अहंकाराखाली तुडवले जावू नये, आज सर्वधर्म समभावाच्या नावाखाली हिंदू धर्माला संपविण्याचे काम विशिष्ट राजकारणींकडून होत आहे. धर्माच्या रक्षणासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्व हिंदूनी एकत्र येऊन धर्माचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे मत हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांनी खानापूर येथील मलप्रभा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या हिंदू धर्मसभेत बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरएसएसचे तालुकाप्रमुख सदानंद कपिलेश्वरी होते. सुरुवातीला आमदार विठ्ठल हलगेकर, संजय कुबल, बाबुराव देसाई, चन्नबसव देवरु, प्रमोद कोचेरी, सदानंद पाटील, सुरेश देसाई, चेतन मणेरीकर, मारुती महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
सुरुवातीला गोमातेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर शंखध्वनी करून शार्दुल जोशी यांनी मंत्रोपचार केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुढे धनंजय देसाई म्हणाले, धर्माचे चिंतन हे हृदयात असले पाहिजे. धर्मांतर हा देशाला लागलेला रोग आहे. या रोगावर वेळीच इलाज न केल्यास भयंकर धोका आहे. धर्माच्या रक्षणासाठी आता रणशिंग फुंकले पाहिजे. आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, आपल्या धर्म आणि संस्कृतीत वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. त्या आपण सन्मानाने पाळल्या पाहिजेत, त्यामुळेच आपल्या धर्माचे आचरण होईल. स्वत:च्या घरापासूनच धर्माच्या रक्षणाची सुरुवात करणे गरजेचे आहे. यावेळी गार्गी पाटील म्हणाल्या, स्वधर्माचा अभिमान बाळगला पाहिजे.
सध्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आहेत. यासाठी या फसव्या प्रेमाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. हैद्राबादमधील आमदार राजसिंह ठाकुर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी चन्नबसव देवरु स्वामी, आयोजक पंडित ओगले यांची भाषणे झाली. यावेळी सदानंद काद्रोळकर, विष्णू काद्रोळकर, पोर्णिमा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सभेला युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अभिजीत कालेकर व विवेक कुरगुंद यांनी सूत्रसंचालन केले. रवी काडगी, मोहन पाटील, यशवंत गावडे, लक्ष्मण बामणे, प्रकाश तिरवीर, बाबासाहेब देसाई, भरमाणी पाटील, अभिजीत चांदीलकर व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.