प्रत्येक गोष्टीत हायकमांडला ओढणे योग्य नाही
एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील नेतृत्त्वाचा गोंधळ स्थानिक पातळीवरच सोडवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत हायकमांडचे नाव ओढणे योग्य नाही, असे एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदावरील गोंधळ दूर करण्यासाठी काँग्रेस नेते सुदर्शन यांनी एआयसीसी अध्यक्षांना पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना ते म्हणाले, सदर पत्र अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. दिल्लीला गेल्यानंतर आम्हाला पत्रातील मजकूर कळेल. त्यांनी पत्र कोणत्या उद्देशाने लिहिले आणि पत्रात काय आहे, ते पाहिल्यानंतर मी निर्णय घेईन, असेही त्यांनी सांगितले.
सुदर्शन यांनी पत्रात काय म्हटले आहे,. त्यांनी काय सल्ला दिला हे पत्र पाहिल्यानंतर कळेल. डी. के. शिवकुमार यांच्या सोमवारच्या दिल्ली भेटीबद्दल मला कोणतीही माहिती नाही. राज्यातील गोंधळ वाढला आहे असे म्हटल्यास तो हायकमांडने निर्माण केलेला नाही. स्थानिक पातळीवर गोंधळ असेल तर तो स्थानिक नेत्यांनीच सोडवावा. प्रत्येक गोष्टीसाठी हायकमांड, हायकमांड असे म्हणत राहणे योग्य नाही, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले.
माझ्यामुळे पक्ष सत्तेत आला असे कोणीही म्हणू नये. कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने पक्ष सत्तेत आला आहे. आम्ही पक्ष बांधला आहे, त्यांनी पक्ष बांधला, असे म्हणणे कार्यकर्त्यांनीही थांबवावे. पक्षात प्रत्येकाची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.