For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भंडारीतील फूट रोखणे महत्वाचे

01:08 PM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
भंडारीतील फूट रोखणे महत्वाचे
Advertisement

भाजपाध्यक्ष दामू नाईक यांची यशस्वी शिष्टाई : समाजाच्या गटांमध्ये घडविले मनपरिवर्तन ,मुख्यमंत्र्यांसोबत मेरेथॉन बैठकांचा धडाका

Advertisement

पणजी : भंडारी समाजासह ओबीसींकडून होणाऱ्या जातनिहाय जनगणना मागणीच्या पार्श्वभूमीवर गुऊवारी रात्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे मेरेथॉन बैठकांचा धडाकाच लागला. त्यात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आघाडी घेताना मनपरिवर्तन करण्याची यशस्वी शिष्टाई केली. त्याही पुढे जाताना समाजात सध्या होत असलेली फाटाफूट थांबवून दोन्ही भंडारी गटांमध्ये दिलजमाई करणे व समाज भक्कम बनविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालविले आहेत. त्याची परिणिती म्हणून गुऊवार पाठोपाठ काल शुक्रवारीही समाजातील काही वरिष्ठ नेत्यांशी दामू नाईक यांनी बैठक घेतल्याचे वृत्त आहे.

राज्यात सध्या गेल्या काही महिन्यांपासून ओबीसींकडून जातनिहाय जनगणनेची जोरदार मागणी होत आहे. या मुद्यावरून राज्यात सर्वात मोठा असलेला भंडारी समाज सरकारच्या विरोधात जात असल्याची भावना पक्षात प्रबळ होऊ लागल्याने राजकीय नेत्यांसह पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले होते. त्या पार्श्वभूमीवर दामू नाईक यांनीच पुढाकार घेताना गत आठवडाभरात वेळोवेळी एक किंवा अनेक नेत्यांशी संपर्क सुरूच ठेवला होता. त्याचे फलस्वऊप गुऊवारी मुख्यमंत्र्यांसाबत बैठकांची मालिकाच आयोजित करण्यात आली.

Advertisement

पहिली बैठक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत घेण्यात आली. त्यात श्रीपाद नाईक, सुभाष शिरोडकर, रवी नाईक, यांचा समावेश होता. या बैठकीत जनगणनेसंबंधी पक्षाचे तसेच केंद्र सरकारचे धोरण यावर चर्चा झाली. दुसरी बैठक ओबीसीतील आमदारांसोबत घेऊन त्यांच्यात एकमत घडविण्याचे यशस्वी प्रयत्न करण्यात आले. या बैठकीस मनोहर आडपईकर, विश्वास सतरकर, प्रेमेंद्र शेट, जीत आरोलकर, संकल्प आमोणकर, दीपक नाईक यांचा समावेश होता. त्यानंतर ईएसजी सभागृहात घेण्यात आलेल्या तिसऱ्या बैठकीत भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद नाईक आणि माजी अध्यक्ष अशोक नाईक यांच्यासह वासुदेव विर्डीकर, बिंदिया नाईक, मंगलदास नाईक, हेमांगी गोलतकर आदी सुमारे 17 नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.

शेवटची बैठक मुख्यमंत्र्यांच्या आल्तीनो निवासस्थानी घेण्यात आली. त्यात भंडारी समाजातील जयेश साळगांवकर, महादेव नाईक, दयानंद मांद्रेकर, दिलीप पऊळेकर, किरण कांदोळकर, दयानंद सोपटे, मिलिंद नाईक, आदी माजी आमदार, मंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, पुढील वर्षी अर्थात 2026 मध्ये राष्ट्रीय पातळीवर जनगणना प्रारंभ होत असल्याने ओबीसींकडून होणारी जातनिहाय जनगणनेची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर ’राज्यात मुस्लिमांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने ओबीसींनी जनगणनेचा जास्तच रेटा लावल्यास सध्या आहे ते आरक्षणदेखील कमी होऊ शकते. या संभाव्य  धोक्याचीही कल्पना सदर भंडारी नेत्यांना दिली. तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा योग्य वाटल्याने मनपरिवर्तन झालेल्या सदर नेत्यांनी आपल्या मागणीत थोडी ढिलाई दर्शविली. तसेच सरकारी भूमिकेचे स्वागतही केले.

मात्र त्याचवेळी आम्ही स्वत: पुढाकार घेऊन समाजाची स्वतंत्र जनगणना सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या उपक्रमास सरकारची काहीच हरकत नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आले. त्याद्वारे ही शिष्टाई करण्यात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना यश आले. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार तत्पूर्वी मंत्री सुभाष शिरोडकर, रवी नाईक यांच्याशी घेतलेल्या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी जातनिहाय जनगणना तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे सांगितले होते. तसेच आमदार जीत आरोलकर, प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर, आदींच्या बैठकीतही याच विषयाची कल्पना देण्यात आली होती.  पैकी भाजपचे मुरगावमधील पदाधिकारी दीपक नाईक वगळता अन्य सर्वांनी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्या सांगण्या समजावण्यावर विश्वास ठेवत त्यांचे म्हणणे मानून घेतले. केवळ दीपक नाईक यांनीच जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर आग्रह धरला होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

फाटाफूट रोखणे अत्यंत महत्वाचे

सध्यस्थितीत भंडारी समाजात पडत असलेली फाटाफूट रोखणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी दोन्ही विरोधी गटांना एकत्र आणणे व समाज भक्कम बनविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न होणे आवश्यक आहे. यावर एकमत झाले. समाजाचे विद्यमान अध्यक्ष देवानंद नाईक आणि गत समितीतील वरिष्ठ पदाधिकारी उपेंद्र गावकर यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. ही फूट समाजासाठी घातक तर आहेच, विरोधकांनाही कुरघोड्या करण्यास विषय मिळत आहे. हे सर्व प्रकार थांबवून या विषयाचा सोक्षमोक्ष लावणे हितकारक ठरणार असल्याच्या मतापर्यंत सर्वजण पोहोचले आहेत, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.