राजण्णांनी राहुल गांधींना पत्र लिहिल्याचे उघड
प्रदेश काँग्रेसमधील राजकीय घडामोडींचा केला उल्लेख : पत्रात सिद्धरामय्यांची घेतली बाजू
बेंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल आणि सत्तावाटपाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आमदार के. एन. राजण्णा यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहल्याचे उघड झाले आहे. प्रदेश काँग्रेसमधील घडामोडींबाबत सदर पत्रात उल्लेख केला आहे. याचबरोबर मत चोरीवरील आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे. ज्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला आणि चुकीच्या अर्थाने तुम्हाला अहवाल दिला. त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
17 नोव्हेंबर रोजी राजण्णा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची बाजू घेतली आहे. 2013 आणि 2023 मध्ये कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेत येण्याचे मुख्य कारण सिद्धरामय्या असल्याचे म्हटले आहे. सिद्धरामय्या हे मागासवर्गीयांना न्याय देणारे नेते आहेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. राजण्णा यांनी आतापर्यंत राहुल गांधींना 4 पत्रे पाठविल्याचे समजते. या सर्व पत्रांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एक अहिंद नेता म्हणून पूर्ण गुण दिले आहेत.
आपण सहकार मंत्री असताना खात्यातील विकासासाठी घेतलेले परिश्र्रम आणि केलेल्या बदलांविषयीही पत्रात नमूद केले आहे. नेहरु कुटुंबाशी एकनिष्ठ असल्याचेही म्हटले आहेत. सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकल्यास पक्षाचे होणारे नुकसान आणि सिद्धरामय्यांमुळे पक्षाला होणारे फायदे याबद्दलही पत्रात उल्लेख केला आहे. आठवड्यातून एक पत्र असे राजण्णा यांनी हायकमांडला 4 पत्रे लिहिली आहेत. सर्व पत्रांमध्ये सिद्धरामय्यांची बाजू मांडल्याचे सांगितले जाते.