शेतकऱ्यांच्या भरपाईबाबत श्वेतपत्रिका काढा!
वनमंत्री ईश्वर खंडे यांची केंद्र सरकारकडे मागणी
बेंगळूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आतापर्यंत किती हप्त्याची रक्कम जमा केली आहे? आतापर्यंत शेतकऱ्यांना किती भरपाई दिली, याबाबत केंद्र सरकार श्वेतपत्रिका जारी करावी, असे आव्हान राज्याचे वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिले आहे. पीक विमा योजनेबद्दल विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी ईश्वर खंड्रे यांच्यावर केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, विमा योजनेवर श्वेतपत्रिका जारी केली तर केंद्र सरकार खासगी विमा कंपन्यांना कसा फायदा मिळवून देत आहे हे स्पष्ट होईल. ज्या दिवसापासून देशभरात पीक विमा योजना लागू झाली, त्या दिवसापासून विमा कंपन्यांचा उद्धार झाला आहे, शेतकऱ्यांचा नव्हे. ही भाजप पुरस्कृत गोलमाल योजना आहे, असा आरोप ईश्वर खंडे यांनी केला. कोविड काळात लोकांना ऑक्सिजन, रेमिडीसिवीर इंजेक्शन मिळाले नाहीत, रोजगाराअभावी लोकांना उपाशी रहावे लागले, तेव्हा दारे बंद करून घरी बसलेले भगवंत खुबा हे आता रस्त्यावर उभे राहून धाडसाने बोलत राहिले तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, लोकांना सत्य माहित आहे, अशी टिप्पणीही खंड्रे यांनी केली.