Heavy Rainfall Alert India| हवामान खात्याचा मोठा इशारा! महाराष्ट्रातील 'या' २३ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट
कोल्हापुर- देशभरात पावसाचा लपंडाव सुरु असतानाच, आता मान्सूनबाबत सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. इस्रोच्या ‘INSAT-3DR’ सॅटेलाईटने घेतलेले ताजे फोटो पाहून हवामान तज्ज्ञदेखील चकित झाले आहेत. या सॅटेलाइट इमेजवरून देशात मान्सून पुन्हा एकदा प्रचंड वेगाने सक्रिय झाल्याचं स्पष्ट होतंय. हवामान खात्याने या पार्श्वभूमीवर काही राज्यांना हाय अलर्ट जारी केला आहे.
सॅटेलाइट चित्रांनुसार, भारताचा जवळपास ६० ते ७० टक्के म्हणजेच दोन तृतीयांश भाग सध्या दाट ढगांनी व्यापून गेला आहे. जम्मू-काश्मीरपासून ते थेट गंगा नदीच्या मैदानी प्रदेशापर्यंत, तसेच बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सूनच्या ढगांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वातावरणातील या अचानक झालेल्या बदलामुळे हवामान तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आता महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती जाणुन घेऊयात.... देशासोबतच महाराष्ट्रातही पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याचा समावेश आहे.
विशेषतः पुणे, नाशिक, जालना, बीड, परभणी, नांदेड, सोलापूर, लातूर आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांना आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
हवामानात वेगाने होणारे हे बदल पाहता, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे.