श्रीकृष्णभक्तीत न्हाऊन निघाली इस्कॉनची रथयात्रा!
हजारो भक्तांचा सहभाग, मनमोहक देखावे, भजन-ढोल-लेझीम पथकांचे सादरीकरण
प्रतिनिधी/ बेळगाव
‘हरी बोलऽऽऽ’च्या गजरात आणि मृदंगाच्या तालावर इस्कॉनतर्फे बेळगावमध्ये 26 वी भव्य जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या रथयात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. भल्या मोठ्या रांगोळ्या, कृष्ण जीवनावरील आधारित देखावे, वारकरी भजनी मंडळ, उत्तर भारतीय ढोलपथक, सजविलेल्या बैलगाड्या व रथामध्ये आरुढ भगवान जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती डोळ्यात साठविण्यासाठी बेळगावसह आसपासचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगावच्या श्री श्री राधागोकुलानंद मंदिराच्यावतीने शनिवारी जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथून या यात्रेला प्रारंभ झाला. बेळगाव इस्कॉनचे प्रमुख श्री भक्तीरसामृत महाराज, मॉरिशस येथील चैतन्य सुंदर महाराज, वृंदावनदास महाराज, एम. एस. अगरवाल, रमाकांत कोंडुसकर, अरुण कटांबळे, कन्नुभाई ठक्कर, राजू हत्तरगी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर कॉलेज रोडमार्गे यंदे खूट, समादेवी गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, एसपीएम रोड, नाथ पै सर्कलमार्गे शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील मंदिरात रथयात्रेची सांगता झाली.
रथयात्रेच्या मार्गावर नागरिकांकडून पाणी, सरबत, फळे यांचे प्रसाद रुपात वितरण केले जात होते. रथ ओढण्यासाठी महिला व पुरुष भक्तांची गर्दी झाली होती. यावर्षी रथयात्रेमध्ये धनगरी ढोलांचाही समावेश करण्यात आला होता. हंदिगनूर येथील भजनी मंडळाने सुश्राव्य आवाजात वारकरी संप्रदायातील भजने सादर केली. कडोली येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उत्तर भारतातून दाखल झालेले ढोलपथक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.
कृष्णावतारांचे दर्शन
कृष्ण जीवनावरील आधारित देखावे रथांवर सादर करण्यात आले होते. कृष्णाचा बालावतार, युद्धाचा प्रसंग यासह विविध प्रसंगांवर आधारित देखावे सादर करण्यात आले. लहान बालकांनी वेशभूषा करून प्रसंग सादर केले. प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक सोहळा बालचमूंनी उत्तम प्रकारे सादर केला. त्यामुळे रथयात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. मुख्य रथावर फुलांची व फळांची नेत्रदीपक आरास करण्यात आली होती.
रथयात्रेची सांगता टिळकवाडी येथील मंदिरात झाल्यानंतर कृष्णावरील आधारित व्याख्याने सादर करण्यात आली. देशभरातील नामवंत कृष्णकथाकार यांच्याकडून कथा सांगण्यात आल्या. सुंदर चैतन्य महाराज, गोलोकचंद्र प्रभू, भक्तीरसामृत महाराज यांनी प्रवचन केले. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवार दि. 11 रोजीही दिवसभर विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.