इशानचे शतक, अर्शदीपचा पंजा
पाचव्या सामन्यात टीम इंडियाचा 46 धावांनी विजय : इशान किशन सामनावीर तर सूर्या मालिकावीर
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपूरम
सामनावीर इशान-सूर्या आणि हार्दिक या त्रिकुटाच्या कडक फलंदाजीनंतर अर्शदीप सिंगने मारलेल्या ‘पंजा’च्या जोरावर भारतीय संघाने तिरुवनंतपुरमच्या मैदानात न्यूझीलंडवर 46 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 271 धावा केल्या. या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 225 पर्यंतच मजल मारू शकला. विशेष म्हणजे टीम इंडियाने पाहुण्या संघाला ‘ऑल आउट’ करत आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचा श•t ठोकला आहे. मालिकेत 242 धावांची बरसात करणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गोरवण्यात आले. 
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सलामीवीर फलंदाज टीम सेफर्टची विकेट पहिल्याच षटकात गमावली. सेफर्ट बाद झाल्यानंतर पण नंतर फिन ऍलेनने वादळी खेळ केला. त्याने भारताच्या प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध मोठे शॉट्स खेळले. त्याला दुसऱ्या बाजूने रचिन रवींद्र साथ देत होता. ऍलेनने 22 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले होते. तो ज्याप्रकारे खेळत होता, त्यावरून न्यूझीलंडच्या आशा जिवंत होत्या. त्याच्या खेळामुळे 8 षटकांमध्येच न्यूझीलंडने 100 धावांचा आकडा पार केला होता. पण अखेर 9 व्या षटकात त्याला अक्षर पटेलने बाद करत भारताला मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिला. ऍलेनने 38 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 80 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर मात्र अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. रचिन रविंद्र (30), डॅरिल मिचेल (26) आणि ईश सोधी (33) धावांचे योगदान दिले. पण इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे किवीज संघाला 225 धावापर्यंत मजल मारता आली आणि टीम इंडियाने हा सामना 46 धावांनी जिंकला.
टीम इंडियाचा दणदणीत विजय
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. अभिषेकने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती. पण, घरच्या मैदानावर खेळणार संजू सॅमसन तिसऱ्याच षटकात 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर अभिषेकही चांगल्या सुरुवातीनंतर पाचव्या षटकात बाद झाला. त्याने 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली. दोघांनाही लॉकी फर्ग्युसनने बाद केले.
इशान किशनचे तांडव
या दोन विकेट्सनंतर मात्र इशान किशनचे वादळ न्यूझीलंडवर घोंगावले. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. इशान किशन अत्यंत आक्रमक खेळत होता. त्याने 28 चेंडूतच अर्धशतक केले आणि त्यानंतर फक्त 42 चेंडूत आपले शतक साजरे केले. या शतकी खेळीत त्याने 10 षटकार आणि 6 चौकारांची आतषबाजी केली. याआधी ईशान किशनचा टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर 89 धावा इतका होता. आपल्या 36 व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने पहिले शतक झळकावले. त्याला सूर्यानेही दमदार साथ दिली. त्यानेही 26 चेंडूत अर्धशतक केले. पण अर्धशतकानंतर तो 15 व्या षटकात बाद झाला. सूर्यकुमारने 30 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 63 धावांचे योगदान दिले. दरम्यान, सूर्या आणि इशान बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली. त्याने 17 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारासह 42 धावांची वादळी खेळी केली. पण, फटकेबाजीच्या प्रयत्नात तो बाद झाला. रिंकू सिंग 8 धावांवर नाबाद राहिला. इशान, सूर्या आणि हार्दिकच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 5 बाद 271 धावांचा डोंगर उभा केला.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 5 बाद 271 (अभिषेक शर्मा 30, संजू सॅमसन 6, इशान किशन 43 चेंडूत 103, सूर्यकुमार यादव 63, हार्दिक 42, फर्ग्युसन 2 बळी, जेकब डफी, जेमिसन, सँटेनर प्रत्येकी 1 बळी).
न्यूझीलंड 19.4 षटकांत सर्वबाद 225 (फिन अॅलन 80, रचिन रविंद्र 30, डॅरिल मिचेल 26, इश सोधी 33, अर्शदीप सिंग 51 धावांत 5 बळी, अक्षर पटेल 3 बळी, रिंकू सिंग 1 बळी).