ही लोकशाही की हुकूमशाही?
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा सवाल : संसदेत सुरू असलेल्या प्रकाराची वाटली लाज
पणजी : भारताच्या राजकीय इतिहासात संसदेत सध्या घडणारे असे व्यवहार आपण कधीच पाहिले नाहीत. सध्या संसदेमधून खासदारांना निलंबित केले जात आहे, ही लोकशाही की हुकूमशाही? अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी आपली उद्विग्नता या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. सध्या जो काही प्रकार संसदेत चालू आहे, त्याची आपल्याला लाज वाटते, असेही ते म्हणाले. राणे हे राजकारणातून निवृत्त झाले असले तरी ते भारतीय राजकारणाकडे सातत्याने पाहत असतात. राजकारणाने दर्जा गमाविला. उद्या आपल्याला जनता विचारणार आहे, याचा विसर राज्यकर्त्यांना पडू नये. आपण एवढी वर्षे या देशाचे राजकारण पाहतोय. परंतु, आपल्या आयुष्यात आपण असा अनुभव कधी घेतलेला नाही. संसदेतील 148 खासदारांना सभागृहातून काढून टाकले जाते ही लोकशाही आहे का? हुकूमशाही? संसदेमधील घटनेने आपण अत्यंत व्यथीत झालो आहे. सारा प्रकार पाहून आपण दु:खी झालो असून झालेल्या प्रकाराची शरमही वाटली, असेही ते म्हणाले. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे जगातील सर्व मंडळी पाहत आहेत. सारे जग आपल्याकडे पाहत आहे, याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. लोकशाहीमध्ये सर्वांनाच आपले मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचा हा अधिकार त्यांना मांडू द्या. इतरांचे म्हणणे देखील ऐकण्याची सवय असावी. आपण संसदेचे काम पाहिले. आपल्या आयुष्यात पहिलांदाच आपण असा हा प्रकार पाहिला. आपल्यास सखेदाश्चर्य वाटते व अत्यंत दु:खी झालो आहे, असे निवेदन करीत सुबुद्धीने वागा, असा प्रेमळ संदेश त्यांनी दिला आहे.