गॅरेंटीपेक्षा जातच महत्वाचा घटक?
चार राज्यांमध्ये झालेल्या मतदानावरुन तज्ञांचे मत
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पूर्ण झाले आहे. तेलंगणात ते 30 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकांचे परिणाम 3 डिसेंबरला हाती लागणार आहेत. पण त्याआधीच या परिणामांचे वेध घेण्यासाठी तज्ञांची मतप्रदर्शने सुरु झाली आहेत.
या पाचही राज्यांमधील निवडणुका यंदा ‘गॅरेंटी’ या शब्दाभोवती फिरताना दिसल्या, असे प्राथमिक विश्लेषण करण्यात आले होते. तथापि, एकंदर या सर्व राज्यांमधील मतदानाचा पॅटर्न आणि पूर्वेतिहास पाहता गॅरेंटीपक्षा जातीचा मुद्दा अधिक प्रभावी ठरला असे दिसून येते, असे अनेक तज्ञांचे निरीक्षण आहे.
सचिन पायटल मागे का ?
राजस्थानात शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तेथे काँग्रेसने मुख्यमंत्री गेहलोत यांनाच त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांच्यापेक्षा अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून आले. यामुळे पायलट यांचा गट निवडणूक प्रचार काळातही नाराज असल्याचे दिसून आले होते. याचे कारणही जातींच्या समीकरणातच आहे. गेहलोत हे माळी समाजाचे असून पायलट गुज्जर समाजाचे आहेत. माळी समाज संख्येने गुज्जर समाजापेक्षा मोठा असल्याने काँग्रेसच्या श्रेष्ठींनी सचिन पायलट यांना मागे ठेवणे श्रेयस्कर मानले असे अनेक पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे मत आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्येही...
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्येही अन्य मागासवर्गिय आणि वनवासी जमातींच्या हाती सत्तेच्या चाव्या असतात. यावेळीही हाच कल दिसून आला आहे. विनामूल्य सोयींची आश्वासने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दिली आहेत. तथापि, विविध जातींची समीकरणे हाच यशाचा निकष याहीवेळी असेल असे असे अनेकांचे मत आहे. छत्तीसगडमध्येही अन्य मागासवर्गिय आणि वनवासी मतदारांची संख्या मोठी असल्याने सूत्रे त्यांच्या हाती आहेत.
तेलंगणातही ‘जात’ निर्णायक
तेलंगणात अद्याप मतदान झालेले नसले, तरी तेथेही गॅरेंटीपेक्षा जात महत्वाची ठरताना दिसून येते. या राज्यात हैद्राबाद विभाग वगळता अन्यत्र अन्य मागासवर्गियांचे प्राबल्य आहे. यावेळी हे विविध समाज कोणत्या पक्षाच्या बाजूने उभे राहतात त्यावर निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.