‘नीट’मध्ये अनियमितता, चौकशी व्हावी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
4 जून रोजी घोषित झालेला नीटचा निकाल वादात सापडला आहे. आता याप्रकरणी काँग्रेसने उडी घेतली आहे. नीटच्या आयोजनात अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करविण्याची मागणी केली आहे. नीटचा मुद्दा तामिळनाडूच्या राजकारणात महत्त्वाचा ठरल्याने काँग्रेसने तो लावून धरल्याचे मानले जात आहे.
प्रथम नीटचा पेपर लीक झाला आणि याच्या निकालात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडुन केला जात आहे. एकाच केंद्राच्या 6 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळण्यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून अनेक प्रकारच्या अनियमितता समोर येत आहेत. दुसरीकडे देशभरात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. हा प्रकार अत्यंत दु:खद आणि हादरवून टाकणारा असल्याचा दावा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका वड्रा यांनी केला आहे.
सर्व विद्यार्थ्यांना या अनियमिततेप्रकरणी प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. याप्रकरणी चौकशी करवून या तक्रारी दूर करण्याची सरकारची जबाबदारी नाही का? सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष का करत आहे असा सवाल प्रियांका वड्रा यांनी केला आहे.
निवडणूक निकालाच्या दिवशी नीटचा निकाल का?
काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. नीटमध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करण्यात आली आहे. यंदा प्रथम पेपर लीक झाल्याचे प्रकरण समोर आले होते, जे दडपण्यात आले. आता अनेक विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात आल्याचे आरोप होत आहेत. यावेळी उच्चांकी 67 विद्यार्थ्यांनी पहिले स्थान मिळविले असून यातील 6 जण तर एकाच केंद्रातील आहेत असा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.
4 जूनला निकाल का?
नीटचा निकाल निवडणूक निकालाच्या दिवशीच जाणूनबुजून का जाहीर करण्यात आला? नीटचा निकाल 14 जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे ठरले होते. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण संशयास्पद आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षा प्रक्रियेत विश्वास मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे, हे केवळ निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीद्वारेच शक्य असल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.