‘होर्मुझ’संबंधी इराण-ओमान चर्चा अंतिम टप्प्यात
वृत्तसंस्था
तेहरान
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराण आणि ओमान यांच्यातील वाटाघाटी निर्णायक टप्प्यावर पोहोचत असल्याचे दिसत आहे. हे एक संभाव्य मोठे यश असल्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष कमी होण्यास मदत होईल. सध्या चर्चेच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या करारानुसार, जहाजे इराण-नियंत्रित मार्गाने पर्शियन आखातात प्रवेश करतील आणि ओमान-नियंत्रित मार्गाने बाहेर पडतील, असे समजते. या मार्गात सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचे जतन करण्यासाठी सेवा शुल्क आकारले जाईल. यासंबंधी वाटाघाटी अजूनही सुरू असून, अंतिम करार विविध स्वरूपाचा असू शकतो.
इराण आणि आखाती अरब देश ओमान यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या कराराच्या दिशेने प्रगती केली आहे. अमेरिकेनेही याबाबत भाष्य करताना लवकरच एक करार होऊ शकतो, असे म्हटले आहे. वृत्तानुसार, इराण आणि ओमान होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीसाठी नवीन नियमांवर चर्चा करत आहेत. इराणमध्ये येणाऱ्या जहाजांवर इराण देखरेख ठेवेल. तर, येथून जाणारी जहाजे ओमानमधून जातील. ओमान जहाजांना परवानगी देईल, परंतु ही पूर्वसूचना इराणलाही दिली जाईल. इराणला आवश्यक वाटल्यास, ते जहाजांची तपासणीही करू शकते, असे करारावरील चर्चेवेळी ठरविण्यात आल्याचे समजते.
सहा तेल कंपन्यांची 81 अब्ज डॉलर्स कमाई
इराण युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे जागतिक महागाईत मोठी वाढ झाली. एप्रिल ते जून दरम्यान, जगातील सहा सर्वात मोठ्या तेल कंपन्यांनी विक्रमी 81 अब्ज डॉलर्सचा नफा कमावला. हा नफा अंदाजे 7.7 लाख कोटी रुपये असून तो भारताच्या 6.81 लाख कोटी रुपयांच्या संपूर्ण वार्षिक संरक्षण बजेटपेक्षा जास्त आहे. युद्ध सुरू झाले तेव्हा कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलर्स प्रतिबॅरल होती. एप्रिल ते जून दरम्यान ती 120 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचली. याचा अर्थ असा की, या काळात तेल कंपन्यांनी अंदाजे 23 टक्के नफा कमावल्याने त्यांची कमाई प्रचंड वाढली आहे.