मनपा आयुक्तांकडून नाल्यांची-निवारा केंद्रांची पाहणी
अधिकाऱ्यांना सतर्कतेबाबत सूचना, पूर आल्यास तातडीने कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करा : आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवा
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन केले असून निवारा केंद्रे स्थापन केली आहेत. शुक्रवारी सकाळीही पाऊस पडत असल्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी विविध नाल्यांना व निवारा केंद्रांना भेट देऊन तेथील नियोजनाची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना त्यांनी केल्या आहेत. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सकाळी 11 वाजताच विविध ठिकाणी जाऊन पाहणी केली. पाऊस अधिक झाला तर पाण्याचा निचरा कशा प्रकारे करावा, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. लेंडी नाला, बळ्ळारी नाला परिसरात भेट दिली.
पाण्याचा प्रवाह वाढला तर पाण्याला वाट करून देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी अधिक पाणी साचल्यास किवा घरांमध्ये पाणी शिरल्यास त्या कुटुंबांची निवारा केंद्रांमध्ये राहण्याची सोय केली जाणार आहे. त्या निवारा केंद्रांची पाहणी अशोक दुडगुंटी यांनी केली. सर्वांना योग्यप्रकारे जेवण देणे, स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे, झोपण्यासाठी अंथरुणाची व्यवस्था करणे, औषध पुरवठा वेळेत करावा, कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. शहरातील विविध भागामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली आहे. जुना पी. बी. रोड, खासबाग, वडगाव, बळ्ळारी नाला या परिसरात भेट देऊन सूचना केल्या आहेत. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.