म्यानमारच्या हजारो बंडखोरांची भारतात घुसखोरी
वृत्तसंस्था/ मोरेह
गृहयुद्धाला तोंड देत असलेल्या म्यानमारमधील 5 हजारांहून अधिक बंडखोर मागील दोन दिवसांमध्ये मिझोरममध्ये घुसले आहेत. म्यानमारचा सीमावर्ती प्रांत चिनमध्ये सैन्याने बंडखोरांवर हवाई हल्ले करत त्यांना भारतीय सीमेत पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय गावांमध्ये या लोकांनी आश्रय घेतला असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक लाल बियाक्थांगा यांनी दिली आहे.
या लोकांसोबत म्यानमारचे 43 सैनिकही भारतीय हद्दीत दाखल झाले होते. यातील किमान 40 सैनिकांना काही तासांमध्येच भारतीय सैन्याने म्यानमारच्या सैन्याच्या हवाली केले आहे. म्यानमारमध्ये जुंटाचे सैन्य आणि सशस्त्र बंडखोर यांच्यातील संघर्षादरम्यान झालेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आता तेथील देखरेख वाढविली आहे. भारत-म्यानमारच्या दुर्गम सीमेदरम्यान घुसखोरी पूर्णपणे रोखणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
मिझोरममध्ये हाय अलर्ट
सुमारे 150 किलोमीटर अंतरापर्यंतची सीमा नैसर्गिक स्थितीमुळे आव्हानात्मक ठरली आहे. या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी आसाम रायफल्सकडे आहे. स्थानिक प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा मिझोरममधील म्यानमारच्या नागरिकांवर नजर ठेवून आहेत. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे मिझोरममध्ये हाय अलर्ट आहे. म्यानमारच्या घुसखोरांमध्ये काही जण जखमी असून यातील एकाचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. तर दुसरीकडे म्यानमारच्या सैन्याकडून सध्या कुठलीच हालचाल करण्यात आलेली नाही. सध्या शांतता असली तरीही म्यानमारचे सैन्य कारवाई करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बंडखोरांकडून हल्ला
म्यानमारचे सैन्य आणि बंडखोर गटांदरम्यान सुरू असलेल्या भीषण संघर्षादरम्यान सुमारे 5 हजार लोक म्यानमारच्या चिन प्रांतातील मिझोरममध्ये पोहोचले आहेत. म्यानमारचे दोन सीमावर्ती सैन्यतळ रिखंद्वार आणि खमावीमध्ये बंडखोरांनी हल्ले केले. याच्या प्रत्युत्तरादाखल म्यानमारच्या सैन्याने या दोन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यांमध्ये पीडीएफ या बंडखोर संघटनेच्या सात सदस्यांचा मृत्यू झाला आहे. सीमावर्ती ताउ नदी जोखवथार (भारतीय क्षेत्र) आणि खमावी (म्यानमार)च्या सीमेला विभागते. रिखंद्वार हे जोखवथारपासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर आहे.