आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर
यास्तिका भाटियाला वगळले : कमलिनीवर विश्वास
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रविवारी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद तर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपद राहिल. मात्र निवड समितीने लॉर्ड्सच्या मैदानावर एकमेव कसोटीत शतक झळकाविणाऱ्या यास्तिका भाटियाला वगळून अनपेक्षित धक्का दिला आहे. तर यष्टीरक्षक आणि फलंदाज जी. कमलिनीवर निवड समितीने पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे.
दुखापतीमुळे फिरकी गोलंदाज श्रेयांका पाटील या स्पर्धेसाठी आपण उपलब्ध राहू शकणार नसल्याचे कळविले आहे. श्रेयांकाच्या जागी अष्टपैलू आणि फिरकी गोलंदाज प्रेमा रावतला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र निवडण्यात आलेल्या अंतिम संघामध्ये श्रेयांकाचा समावेश करण्यात आला असला तरी तिला या स्पर्धेपूर्वी तंदुरुस्तीची चाचणी द्यावी लागेल. 24 वर्षीय प्रेमा रावतने आतापर्यंत एकमेव सामना भारतातर्फे महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर मँचेस्टरमध्ये झाला होता.
आशियाई स्पर्धेतील महिलांची क्रिकेट स्पर्धा ऑगस्ट अखेरीस ते सप्टेंबर मध्यंतरापर्यंत होणार असून या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 17 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिलांच्या द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेत भारताच्या चार महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या आहेत. उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष हे या स्पर्धेत खेळत आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष, जी. कमलिनी, अरुंधती रे•ाr, प्रेमा रावत, राधा यादव, श्रीचरणी, रेणुका ठाकुर, नंदीनी शर्मा, क्रांती गौड. राखीव खेळाडू : प्रतीका रावल, उमा छेत्री, वैष्णवी शर्मा, सायली सातघरे आणि मिन्नू मणी.