2036 ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताची तयारी
व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ .वाराणसी
भारत 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी तयारी करत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी केला आहे. वाराणसी येथे सुरू झालेल्या 72 व्या सीनियर राष्ट्रीय व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपचे उद्घाटन मोदींनी केले आहे. मागील साडेअकरा वर्षांमध्ये सरकारने देशातील क्रीडाक्षेत्रात व्यापक बदल करत 20 हून अधिक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि भारत पूर्ण मजबुतीने 2036 च्या ऑलिम्पिकच्या आयोजनाचीही तयारी करत असल्याचे वक्तव्य मोदींनी यावेळी केले आहे.
मागील एक दशकात अनेक शहरांमध्ये फीफा अंडर 17 विश्वचषक आणि हॉकी विश्वचषकासमवेत 20 हून अधिक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. 2030 ची राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धाही भारतातच आयोजित होणार आहे. भारत पूर्ण मजबुतीने 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी तयारी करत आहे. अधिकाधिक क्रीडापटूंना खेळण्याच्या अधिक संधी मिळाव्यात असा प्रयत्न यामागे असल्याचे मोदी म्हणाले.
रिफॉर्म एक्स्प्रेस
देश सध्या ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’वर स्वार आहे, देशाचे प्रत्येक क्षेत्र, विकासाची प्रत्येक व्याख्या या ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’शी जोडली जात असून खेळांची व्याख्याही यापैकी एक आहे. क्रीडा क्षेत्रातही सरकारने मोठे व्यापक सुधार केले आहेत. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम आणि खेलो भारत धोरण 2025 अशाप्रकारच्या तरतुदींद्वारे योग्य प्रतिभेला संधी मिळेल, क्रीडा संघटनांमध्ये पारदर्शता वाढेल आणि देशाच्या युवांना क्रीडा आणि शिक्षण दोन्ही क्षेत्रांमध्ये एकाचवेळी पुढे जाण्याची संधी मिळेल. एकीकडे आम्ही चांगल्या मूलभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्याची व्यवस्था तयार करत आहोत आणि त्याचबरोबर युवांना आकर्षक अनुभव मिळवून देण्यासाठीही काम करत आहोत असे मोदी यांनी सांगितले आहे.
इंडिया फर्स्ट भावना
एकेसमयी खेळांवरुन सरकार आणि समाज दोन्हींमध्ये उदासीनतेचे वातावरण होते. अत्यंत कमी युवाच क्रीडाक्षेत्राला स्वत:ची कारकीर्द म्हणून स्वीकारत होते, परंतु मागील दशकात खेळांवरून सरकार आणि समाज दोन्हींच्या मानसिकतेत बदल दिसून येत आहे. देशाचा प्रत्येक जण, प्रत्येक वर्ग एका सामूहिक चेतनेने ‘इंडिया फर्स्ट’च्या भावनेने देशासाठी काम करत आहे. स्वच्छतेपासून डिजिटल पेमेंटपर्यंत आणि एक वृक्ष आईच्या नावापासून विकसित भारताच्या अभियानापर्यंत देशाचा प्रत्येक जण सामूहिक चेतनेसह इंडिया फर्स्टच्या भावनेने देशासाठी काम करत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.