झिंबाब्वे दौऱ्यासाठी भारताचा सुधारित संघ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ झिंबाब्वेच्या दौऱ्यावर रवाना झाला. दरम्यान या संघासमवेत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहतील. भारत आणि यजमान झिंबाब्वे यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला हरारेत 6 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. दरम्यान या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या संघामध्ये साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला आहे.
या दौऱ्यासाठी यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघातील संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे अद्याप भारतीय संघाबरोबर विंडीजमध्ये आहेत. आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाचे प्रयाण वादळी वातावरणामुळे लांबणीवर पडले. दरम्यान मंगळवारी सायंकाळी भारतीय क्रिकेट संघ चार्टर विमानाने भारताकडे प्रयाण करणार असून बुधवारी सकाळी नवी दिल्लीमध्ये त्यांचे आगमन होणार आहे. माय देशातील आगमनानंतर भारतीय संघातील खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
भारतीय सुधारित संघ- शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिस्नॉई, आवेश खान, खलिल अहमद, मुकेशकुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा.