भारताची निर्यात 2 ट्रिलियन डॉलर्स शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या सहा वर्षांमध्ये भारताने निर्यातीचे उद्दिष्ट्या 2 लाख कोटी डॉलर्स (साधारणत: पावणेदोन कोटी कोटी रुपये) इतके ठेवले आहे. ते साध्य होईल, असा विश्वास केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. जगाची परिस्थिती या काळात कशीही राहिली तरीही हे लक्ष्य साध्य केले जाणार आहे. भारताची अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे, त्यानुसार हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गोयल यांनी एका कार्यक्रमात दिली.
काही आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम निर्यातीवर होत आहे, ही बाब स्वीकारणे आवश्यक आहे. या घटनांमध्ये प्रामुख्याने युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध तसेच इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष या दोन घटनांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सध्या भारताची निर्यात 770 अब्ज ते 775 अब्ज डॉलर्स इतकी आहे. येत्या सहा ते सात वर्षांमध्ये ती साधारणत: तिपटीने वाढण्याची शक्यता आहे. भारतातील अनेक उद्योगांचा निर्यातीत मोठा सहभाग राहिला आहे. तागाच्या उद्योगातून भारताने 1 हजार 500 कोटी रुपयांची निर्यात साध्य केली आहे, अशी माहिती त्यांनी ताग संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिली.
तागाच्या निर्यातवाढीला संधी
भारतात पारंपारिक पद्धतीने तागाच्या अनेक वस्तू निर्माण केल्या जातात. या वस्तूंना विदेशांमध्ये मोठी मागणीही आहे. सध्याच्या पर्यावरणस्नेही उद्योगांच्या आवश्यकतेच्या काळात तागापासून निर्माण होणाऱ्या वस्तूंची मागणी अधिक वाढू शकते. त्यामुळे या उद्योगाने स्वत:ला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज करावे. केंद्र सरकार त्यांना आवश्यक ते साहाय्य देईल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.