भारताची अर्थव्यवस्था 6.5 टक्के विकसित राहणार
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने विकसित राहणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केला आहे. जागतिक स्तरावरती तणावाची पार्श्वभूमी असतानाही देशाचा आर्थिक विकास हा 6.5 टक्के इतका चांगला यावर्षी राहणार असल्याचे त्यांनी सांगून यायोगे भारत इतर देशांच्या तुलनेमध्ये विकसित अर्थव्यवस्था असणाऱ्या जागतिक देशांच्या यादीत आघाडीवर राहणार आहे, असे म्हटले आहे.
आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये हा विकासदर जरी कमी असला तरी इतर देशांच्या तुलनेमध्ये विकास दर चांगला आहे. इतर महत्त्वाच्या देशांच्या बाबतीत कामगिरी पाहता भारताची आर्थिक स्थिती ही अधिक चांगली आहे, असेही मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काच्या पार्श्वभूमीवर चीनसह इतर देशांमध्ये सुद्धा तणावाची स्थिती आहे.
स्थिरतेमुळे विकासाला गती
अलीकडे रिझर्व्ह बँकेने रेपोदरामध्ये कपात केल्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे. देशातील स्थिरता कायम राहिली असून गुंतवणूकदारांचा विश्वास भारताच्या बाबतीमध्ये वाढताना पाहायला मिळतो आहे, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्याला देशांतर्गत मागणी ही वाढीच्या दिशेने राहिलेली असून निर्यातीवर कमी अवलंबित्व असल्यामुळे देशाला निश्चित दिशेने योग्य गती राखण्याची संधी असणार आहे.