बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था, टोरँटो (कॅनडा)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या सुपर 300 कॅनडा खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या आकर्षी काश्यप आणि तान्या हेमंत यांना एकेरीच्या दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या एकेरीतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या बेविन झेंगने आकर्षी काश्यपचा 20-22, 21-17, 21-17 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना 70 मिनिटे चालला होता. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात जपानच्या तृतिय मानांकीत रिको गुंजीने भारताच्या तान्या हेमंतचा 21-11, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 31 मिनिटांत फडशा पाडला. या स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतला दुखापतीमुळे यापूर्वीच माघार घ्यावी लागली होती. तसेच देविका सिहाग, रक्षिता रामराज, अनमोल खर्ब, श्रीयांशी वलीशेट्टी, सनित दयानंद तसेच शंकर सुब्रमनीयन यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. आता भारतीय बॅडमिंटनपटू 14 जुलैपासून सुरू होणाऱ्या जपान खुल्या 750 बॅडमिंटन स्पर्धेत आपला सहभाग दर्शविणार आहेत.