मुष्टियुद्ध स्पर्धेतील भारताची 43 पदके निश्चित
वृत्तसंस्था/ अॅस्टेना (कझाकस्तान)
येथे सुरु असलेल्या एएसबीसी आशियाई 22 वर्षाखालील तसेच युवा मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने विक्रमी 43 पदके निश्चित केली आहेत. शनिवारी या स्पर्धेत पुरुषांच्या 22 वर्षाखालील गटात आकाश गुरखा, विश्वनाथ सुरेश, निखिल आणि प्रित मलिक यांनी आपल्या वजन गटातून अंतिम फेरी गाठली आहे.
60 किलो वजन गटात आकाश गुरखाने उंपात्य लढतीत उझबेकच्या सेयातचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 48 किलो वजन गटात भारताच्या विश्वनाथ सुरेशने फिलिपिन्सच्या ब्रायनवर 5-2 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. निखिलने 57 किलो गटात तर प्रितने 67 किलो वजन गटात आपले उपांत्य फेरीचे सामने जिंकलेत निखिलने मंगोलीयाच्या गेनबोल्डचा तर प्रितने किर्झिस्थातच्या अल्माझचा 5-2 असा पराभव केला. मात्र 51 किलो गटात भारताच्या जादूमनी सिंग, 63.5 किलो गटात अजय कुमार, 71 किलो गटात अंकुश, 80 किलो गटात ध्रुवसिंग, 86 किलो गटात जुगनू आणि 92 किलो गटात युवराज यांचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागत आहे.
महिलांच्या विभागात भारताच्या 9 स्पर्धकांनी विविध वजन गटात उपांत्य फेरी गाठली आहे. 54 किलो गटात प्रितीने, 52 किलो गटात निशाने, 60 किलो गटात निकिता चांदने, 92 किलोवरील गटात लक्ष्य राठी, 48 किलो गटात अनू, 57 किलो गटात यात्री पटेल, 66 किलो गटात पार्थवी ग्रेवाल, 70 किलो गटात आकांशा आणि 81 किलो वरील गटात निर्जेला बाणा यांचे आव्हान मात्र समाप्त झाल्याने ते कांस्यपदकाचे मानकरी ठरले आहेत.
युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत पुरूष आणि महिलांच्या विभागात एकूण 14 स्पर्धकांनी विविध वजन गटातून अंतिम फेरी गाठली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने विक्रमी 43 पदके निश्चित केली आहेत. या स्पर्धेमध्ये 24 देशांचे स्पर्धक सहभागी झाले आहेत.