भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियावर विजय
दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात एकमेव गोलने यश
वृत्तसंस्था/ पर्थ
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या हॉकी सामन्यात भारतीय महिलांनी 1-0 अशा गोलफरकाने रोमांचक विजय मिळवित दौऱ्याची सांगता केली. या दौऱ्यातील भारतीय महिलांचा हा एकमेव विजय ठरला.
स्ट्रायकर नवनीत कौरने भारताचा एकमेव विजयी गोल 21 व्या मिनिटाला नोंदवला. भारताने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध 3-5, 2-3 असे पराभव स्वीकारल्यानंतर वरिष्ठ संघाविरुद्ध 0-2 व 2-3 असे पहिले दोन सामने गमविले होते. 1 व 3 मे रोजी हे सामने झाले होते. पाहुण्या भारत संघाने आपला सर्वोत्तम खेळ शेवटच्या सामन्यात दाखवला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या शेवटच्या सामन्यातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजविताना दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण भारताच्या भक्कम बचावामुळे त्यांना गोलपासून वंचित रहावे लागले.
दुसऱ्या सत्रातील सहाव्या मिनिटाला भारताने मैदानी गोल नोंदवत आघाडी घेतली. उपकर्णधार नवनीत कौरने हा गोल नोंदवला. शनिवारी गमविलेल्या सामन्यातही तिने गोल नोंदवला होता. उत्तरार्धातील दोन्ही सत्रात दोन्ही संघांनी गोल नोंदवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण त्याचा त्यांना लाभ मिळाला नाही. भारताने संयम राखत ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न फोल ठरविले आणि मिळविलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत विजय साकार केला.