दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय महिला संघाला धक्का
इंग्लंडचा 26 धावांनी विजय : मालिका बरोबरीत
वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल
इंग्लिश महिला संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय महिला संघाला 26 धावांनी पराभूत केले. या विजयासह इंग्लिश महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. उभय संघातील तिसरा व निर्णायक सामना दि. 2 जून रोजी खेळवला जाईल.
इंग्लिश महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या. एमी जोन्स आणि एलिस केप्सीने 28 धावांचे योगान दिले. डॅनी हॉजने 29 धावा केल्या. याशिवाय, फ्रेया केम्पने सर्वाधिक नाबाद 39 धावांचे योगदान दिले. या जोरावरच इंग्लंडने 168 धावापर्यंत मजल मारली. भारताकडून श्री चरणीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
दुसरीकडे, विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला 9 बाद 142 धावापर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली पण यामध्ये सातत्य राखता आले नाही. यास्तिका भाटियाने 33 तर स्मृती मानधनाने 32 धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौरने 28 तर शेफाली वर्माने 22 धावा केल्या. इतर महिला फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने भारतीय संघाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडकडून लॉरेन बेल, चार्ली डीन आणि फ्रेया केम्प यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.