श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ कोलंबोत दाखल
वृत्तसंस्था
कोलंबो
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ दोन सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी श्रीलंकेतील कोलंबो येथे दाखल झाला. मात्र, संघाचा युवा सलामीवीर बी. साई सुदर्शन दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने तो अद्याप संघासोबत रवाना झालेला नाही. सध्या तो बेंगळूर येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (सीओई) वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करत आहे.
साई सुदर्शनला अलीकडील भारत ‘अ’ संघाच्या श्रीलंका दौऱ्यात पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असून तो आता नेट्समध्ये तासभराहून अधिक वेळ फलंदाजीचा सराव करत आहे. पुढील तीन ते चार दिवस त्याच्या प्रकृतीचे बारकाईने मूल्यमापन करण्यात येणार असून त्यानंतरच त्याच्या श्रीलंका दौऱ्यातील सहभागाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
सुदर्शन पूर्णपणे तंदुऊस्त झाल्याशिवाय त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू दिले जाणार नाही. दुखापतीतून घाईघाईने पुनरागमन केल्यानंतर पुन्हा फिटनेस समस्या निर्माण होऊ नयेत, याची वैद्यकीय पथक विशेष काळजी घेत आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
भारतीय संघ 7 ऑगस्टपासून कोलंबोतील क्रिकेट क्लब मैदानावर तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर संघ 15 ऑगस्टपासून गॅले येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रवाना होईल. मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. साई सुदर्शन वेळेत पूर्णपणे तंदुऊस्त होऊन दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात सहभागी होऊ शकेल, अशी आशा वैद्यकीय पथकाला आहे.