भारतीय नेमबाजांना हुकली अंतिम फेरी
वृत्तसंस्था, अल्माटी (कझाकस्थान)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक शॉटगन आंतरराष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला स्कीट नेमबाजांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. भारताचे ऑलिम्पिक नेमबाज मैराज अहमद खान आणि रायझा धिलाँ यांची पात्र फेरीतील कामगिरी इतर भारतीयांपेक्षा सरस झाली.
पुरूषांच्या स्कीट नेमबाजी प्रकारात भारताच्या मैयराज अहमद खानला पात्र फेरीमध्ये एकूण 119 शॉट्ससह 18 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर भवतेग सिंग गिल याने या क्रीडा प्रकारात 19 वे स्थान मिळविले. भारताचा आणखी एक ऑलिम्पिक नेमबाज अनंतजित सिंग नरुका याने एकूण 117 गुणांसह 38 वे स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या भारताचा तिसरा नेमबाज तसेच राष्ट्रीय विजेतप् गुरजोत सिंग खंगुरा 54 व्या स्थानावर राहिला. त्याने 115 गुण नोंदविले. अभयसिंग सेखाँ 71 व्या स्थानावर राहिला. त्याने 113 गुण नोंदविले.
महिलांच्या स्कीट नेमबाजी प्रकारात भारताच्या गनेमत सेखाँने 112 गुणांसह 33 वे स्थान मिळविले तर रायझा धिलाँने 115 गुणांसह 17 वे स्थान तसेच परीनाझ धालीवालने 112 गुणांसह 32 वे स्थान, वन्शिका तिवारी आणि रश्मी राठोड यांनी अनुक्रमे 29 वे आणि 47 वे स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये मंगळवारी एकाही भारतीय स्कीट नेमबाजांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.