For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय राजकारण परिवारांची मालमत्ता नव्हे!

01:07 AM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय राजकारण परिवारांची मालमत्ता नव्हे
Advertisement

राजकारणातील घराणेशाहीवर थरूर यांचा प्रहार : काँग्रेसलाच लक्ष्य केल्याची चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकशाहीचे खरे आश्वासन ‘जनतेचे सरकार, जनतेकडून, जनतेसाठी’ आहे. परंतु जोपर्यंत भारतीय राजकारण परिवारांची मालमत्ता म्हणून राहिल तोपर्यंत हे पूर्ण होऊ शकत नसल्याची टिप्पणी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केली आहे. भारताने घराणेशाहीच्या जागी योग्यता आधारित राजकारण अवलंबिण्याची हीच वेळ आहे. याकरता राजकीय पक्षांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, यात कार्यकाळाची मर्यादा निश्चित करणे आणि पक्षात प्रामाणिकपणे निवडणूक करविणे सामील असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.

Advertisement

मतदारांनाही शिक्षित आणि जागरुक करणे आवश्यक आहे. मतदारांनी कुठलेही आडनाव पाहून नव्हे तर पात्रता पाहून मतदान करण्याची गरज आहे. जेव्हा सत्ता एखाद्याची पात्रता किंवा जनतेशी जवळीक याऐवजी पारिवारिक ओळखीवर निश्चित होते, तेव्हा शासनाच गुणवत्ता खालावत असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.

ही समस्या केवळ काँग्रेसपुरती मर्यादित नाही, तर पूर्ण राजकीय व्यवस्थेत फैलावलेली आहे. जेव्हा एखाद्या उमेदवाराची सर्वात मोठी ओळख त्याचे आडनाव असते, तेव्हा गुणवत्तेची कमतरता निर्माण होते आणि लोकशाही कमकुवत होत असल्याचे थरूर यांनी स्वत:च्या लेखामध्ये नमूद केले आहे.

अनेक उदाहरणे

स्वत:चा लेख ‘इंडियन पॉलिटिक्स आर ए फॅमिली बिझनेस’मध्ये थरूर यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. ओडिशात बीजू पटनायक यांच्यानंतर त्यांचे पुत्र नवीन पटनायक यांनी नेतृत्व सांभाळले. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे आणि मग त्यांचे पुत्र आदित्य यांच्यापर्यंत परिवाराच्या अंतर्गत राजकारणाची धुरा पोहोचली. उत्तरप्रदेशात मुलायम सिंह यादव ते अखिलेश यादव, बिहारमध्ये रामविलास पासवान ते चिराग पासवान आणि पंजाबमध्ये प्रकाशसिंह बादल ते सुखबीर बादलांपर्यंत याच कहाणीचा पुनरुच्चार झाला असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवारांचा दीर्घकाळापासून दबदबा आहे. हा प्रकार केवळ भारतात नव्हे तर पूर्ण दक्षिण आशियात दिसतो. पाकिस्तानात भुट्टो आणि शरीफ परिवार, बांगलादेशात शेख आणि जिया परिवार आणि श्ऱीलंकेत बंडारनायके आणि राजपक्षे परिवाराचे वर्चस्व दिसून येत असल्याचे त्यांनी लेखात नमूद पेले आहे.

राजकीय परिवारांवर टिप्पणी

भारतासारखी मोठी लोकशाही जेव्हा या घराणेशाहीला स्वीकारते, तेव्हा हे आणखी विरोधाभासी वाटते. परिवार एका ब्रँडप्रमाणे काम करतो, लोकांना त्यांना ओळखण्यास आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास वेळ लागत नाही. याचमुळे अशा उमेदवारांना मते मिळत असल्याची टिप्पणी थरूर यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.