माल्टाचे जहाज वाचविण्यासाठी भारतीय नौदल सज्ज
समुद्री चाच्यांचा प्रतिकार करण्यासाठी पाठविली अरबी समुद्रात युद्धनौका, संघर्षात होत आहे सरशी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
माल्टा या देशाच्या एका व्यापारी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न सोमालियाच्या समुद्री चाचांनी केला आहे. यानंतर भारताने पुढाकार घेऊन या जहाजाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या नौसेनेची एक युद्धानौका अरबी समुद्रात धाडली आहे. एमव्ही रुएन असे अपहृत जहाजाचे नाव आहे.
14 डिसेंबरला ही अपहरणाची घटना घडली. त्यानंतर भारतीय नौसेनेला एक संदेश पाठविण्यात आला. माल्टाचे हे जहाज दक्षिण कोरियातून तुर्किये या देशाकडे निघाले होते. हे जहाज सोमालियाच्या जवळ आल्यानंतर तेथील समुद्री चाचांनी ते पकडण्याचा प्रयत्न केला. हे जहाज चाचे सोमालियाकडे घेऊन निघाले होते.
भारताची त्वरित कारवाई
भारताला अपहरणाच्या प्रयत्नाचा संदेश प्राप्त झाल्यानंतर भारताने या जहाजाला वाचविण्याचे प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे. भारतीय नौदलाची अदन ही युद्धनौका अरबी समुद्रात तातडीने पाठविण्यात आली आहे. हे जहाज सोकोट्रा बेटांपासून येमेनच्या दिशेने जवळपास 380 नॉटिकल मैल अंतरावर आहे. माल्टाच्या जहाजावरुन संदेश येताच भारताने त्वरित कारवाईला प्रारंभ केला आहे.
विमानांतून सर्वेक्षण
नौसेनेची युद्धनौका पाठविण्याअगोदर भारताने आपल्या वायुदलाच्या विमानांमधून या पूर्ण सागरी प्रदेशाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात अपहरणाचा प्रयत्न झालेले माल्टाचे जहाज अरबी समुद्रात नेमके कोठे आहे, याचा शोध घेण्यात आला आहे. त्याचे स्थान निश्चित झाल्यानंतर तेथे युद्धनौका पाठविण्याचा निर्णय नौदलाकडून घेण्यात आला, अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली आहे.
2017 नंतरची गंभीर घटना
2017 नंतर अरबी समुद्रात जहाजाचे अपहरण करण्याचा प्रथमच प्रयत्न आहे. अलिकडच्या काळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केनियाच्या राष्ट्रतींशी बोलणी केली आहेत. त्यांनी चर्चेत समुद्री सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला होता. भारताने अनेकवेळा इतर देशांशी सहकार्य करुन अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात अशी प्रकारची कारवाई समुद्री चाचांविरोधात केली आहे,.
अन्य देशांचीही जहाजे
माल्टाच्या या जहाजाची सुटका करण्यासाठी भारताप्रमाणेच युरोपियन महासंघ आणि स्पेनच्या काही युद्धनौका अरबी समुद्राकडे निघाल्या आहेत. भारताची युद्धनौका जवळपास अपहरण होत असलेल्या जहाजापाशी पोहचली आहे. समुद्री चाच्यांशी ही युद्धनौका लवकरच भिडेल अशी शक्यता आहे.
सोमालियानजीकचा समुद्र धोकादायक
व्यापारी जहाजांसाठी आता सोमालिया नजीकचा समुद्र धोकादायक झाला आहे. कारण, या समुद्रावर आता याच देशाच्या चाच्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. 1990 मध्ये सोमालियात गृहयुद्ध सुरु झाल्यानंतर येथील सरकारचे देशावरचे नियंत्रण ढिले पडले आहेत. याचा लाभ समुद्रात चाचेगिरी करुन व्यापारी जहाजे लुटणाऱ्या टोळ्यांनी घेतला आहे. त्यांनी सोमालियाचा सागर किनारा आपल्या ताब्यात जवळपास घेतला आहे. त्यामुळे गेल्या 30 वर्षांमध्ये चाचेगिरीचे प्रमाण वाढले आहे. 1990 पूर्वी सोमालिया नजीकच्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालत असे. त्यावेळी चाचेगिरीचा धोका नव्हता. पण गृहयुद्ध झाल्यापासून परिस्थितीत परिवर्तन झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. 2005 पर्यंत समुद्री चाच्यांचा धंदा जोरात चालला होता. त्यांनी एक पायरेट स्टॉक एक्स्चेंजही निर्माण केले होते. तथापि, नंतर बरेचसे देश सावध झाल्यानंतर त्यांनी आपल्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी नौसेनेच्या युद्धनौका पाठविण्यास प्रारंभ केला आहे. भारताची भूमिका या संरक्षण कार्यात महत्वाची असून अरबी समुद्रात सर्वात मोठे नौदल असलेला भारत हा एकमेव देश आहे. परिणामी, अनेक लहान देश त्यांच्या जहाजांचे अपहरण झाल्यास भारताकडे साहाय्य त्यांच्याकडून मागितले जाते.
अपहृत जहाजाला भारताचे सहाय्य
ड माल्टाच्या जहाजाचे संरक्षण करण्यासाठी भारताचा पुढाकार
ड भारताची युद्धनौका जहाजवळ पोहचली, चाच्यांचा प्रतिकार
ड 1990 पासून सोमालियाचा सागरतट बनला आहे घातक
ड गृहयुद्धामुळे सोमालियाचा सागरतट समुद्री चाच्यांच्या हाती