भारताचे ड्रोन पाकिस्तानच्या भागात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे एक ड्रोन शुक्रवारी पाकिस्तानच्या भागात गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हे ड्रोन हेतुपुरस्सर सोडण्यात आलेले नसून ते तांत्रिक चुकीमुळे पाकिस्तानची सीमा पार करुन पलिकडच्या भागात गेले, असे स्पष्टीकरण भारताने नंतर केले आहे.
हे ड्रोन छोट्या आकाराचे होते आणि प्रशिक्षणासाठी उपयोगात आणण्यात येत होते. ते भारतीय भूसेनेच्या स्वामित्वातील होते. सध्या सीमेवर सैनिकांना ड्रोन सोडण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण भारताच्या सीमेच्या आतल्या भागात होत आहे. तथापि, काही तांत्रिक समस्येमुळे त्याच्यावरील नियंत्रण सुटले आणि ते सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले. तेथे ते कोसळले. हे गुप्तहेरगिरी करणारे ड्रोन असल्याचा आरोप पाकिस्ताने केला आहे. तथापि, भारताने या आरोपचे खंडन करताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गस्ती ड्रोन
या ड्रोनचा उपयोग सीमेवर नेहमीची गस्त घालण्यासाठी करण्यात येत होता. पाकिस्तानच्या भागात ते कोसळल्यानंतर त्याचा ताबा पाकिस्तानी सैनिकांनी घेतला आहे. भारताच्या सेना प्रवक्त्याने त्वरित पाकिस्तानशी हॉट लाईनवरुन संपर्क साधून ड्रोनने सीमा पार केल्याची माहिती पाकिस्तानच्या सेनेला दिली. मात्र, पाकिस्तानने अद्याप ते ड्रोन भारताला परत केलेले नाही.