For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय सैन्याचा विजयघोष

06:32 AM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय सैन्याचा विजयघोष
Advertisement

सैन्यदलामध्ये शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना विशेषत: युद्ध वा युद्धसदृश प्रसंगी त्यांना अधिक कृतिशील करण्यासाठी संबंधित पलटणींच्या परंपरागत व स्फूर्तीदायक विजय घोषांच्या जोडीला विशेष प्रसंगानुरुप व महत्त्वाच्या कामगिरीला तेवढेच सूचक व स्फूर्तीदायी नामाभिदान दिले जाते. परिणामी सैनिक युद्धभूमी वा अन्य विशेष कामगिरीवर शर्थीने प्रयत्न करून यशस्वी होतात असा भारतीय सैन्यदलाचा गौरवपूर्ण इतिहास राहिला आहे.

Advertisement

काम करणाऱ्या प्रत्येकाला काम करताना प्रोत्साहन मिळणे गरजेचे व महत्त्वाचे असते. हे प्रोत्साहन विविध प्रकारे, वेगवेगळ्या टप्प्यावर व वेगवेगळ्या स्वरुपात वा संदर्भात दिले जाऊ शकते. मात्र या प्रोत्साहनाच्या व्यक्ती म्हणून कर्मचाऱ्याच्या कामावर निश्चितपणे परिणाम होत असतो. कर्मचाऱ्यांना संस्था वा व्यवस्थापनाकडून अशा प्रकारे दिले जाणारे प्रोत्साहन विविध स्वरुपात दिले जाते. यामध्ये प्रशस्तीपत्रापासून प्रोत्साहनपर रक्कम वा विशेष चीज वस्तुंचा समावेश करण्याची प्रस्थापित प्रथा आहे. सेना व सैन्यदलदेखील या प्रोत्साहन-प्रक्रियेला अपवाद कसे ठरणार?

सैन्यदलामध्ये शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना विशेषत: युद्ध वा युद्धसदृश प्रसंगी त्यांना अधिक कृतिशील करण्यासाठी संबंधित पलटणींच्या परंपरागत व स्फूर्तीदायक विजय घोषांच्या जोडीला विशेष प्रसंगानुरुप व महत्त्वाच्या कामगिरीला तेवढेच सूचक व स्फूर्तीदायी नामाभिदान दिले जाते. परिणामी सैनिक युद्धभूमी वा अन्य विशेष कामगिरीवर शर्थीने प्रयत्न करून यशस्वी होतात असा भारतीय सैन्यदलाचा गौरवपूर्ण इतिहास राहिला आहे. मात्र पहलगाम प्रकरणानंतरच्या विशेष कामगिरीला देण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर व त्यापाठोपाठ काश्मीरच्या सीमाक्षेत्रात दहशतवाद आणि दहशतवाद्यांचे निर्दालन करण्यासाठी केलेल्या अनुक्रमे ‘ऑपरेशन सिंदूर’ व ‘महादेव’ या मोहिमांच्या नावांवर अनाठायी व अनावश्यक स्वरुपातील चर्चा झाल्याचे दिसून येते.

Advertisement

सध्याच्या टीव्ही चर्चांच्या धडाक्यात हे आणि असे अनावश्यक मुद्दे आणि चर्चांवर आवश्यकतेहून अधिक वेळ अनाठायी स्वरुपात देण्यात आला. या दोन्ही लष्करी मोहिमांमधील ‘सिंदूर’ व ‘महादेव’ या नावांवरच आक्षेप घेणाऱ्यांचा भर होता. त्या दरम्यान भारतीय सैन्यदल व जम्मू काश्मीर पोलीसदलाने संयुक्तपणे कारवाई करून ठराविकच नव्हे तर अल्पावधीत दहशतवादाच्या विरोधात आपली उद्दिष्टपूर्ती केली. असे असताना मात्र सैन्यदलांच्या या यशस्वी कामगिरीची चर्चा न करता वरील नावांवर टीका करण्यातच अनेकांनी इतिकर्तव्यता मानली. हे निश्चितच खेदजनक म्हणायला हवे.

मात्र सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे सैन्याची पूर्वापार व गौरवशाली परंपरेकडे टीकाकारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते. सैन्यदलांच्या अभ्यासकांच्या मते काश्मीरमधील दहशतवादाचे निर्दालन करणाऱ्या सैन्यदलाच्या कामगिरीवर टीका करणाऱ्यांनी यासंदर्भात सैन्यदलाच्या कामकाज आणि कामगिरी या दोन्हीची मुळात माहितीच करून घेतली नाही. परिणामी मुद्यांवर मुद्दे व टीकेवर आधारित चर्चा असेच त्याचे स्वरुप राहिले. त्यांच्या मते सैन्यदलाच्या कामगिरीला यशस्वी करण्यासाठी विजय मिळविणाऱ्या वा यशस्वी प्रतीक आणि परंपरांची मोठी  कामगिरी व भूमिका असते. यालाच इतिहासासह भूगोलाची जोड देण्याची पद्धत भारतीय सैन्याने पूर्वांपार स्वरुपात व यशस्वीपणे स्विकारलेली आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

महिलांचे कुंकू पुसून त्यांचे संसार उजाडणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ पेक्षा सैन्याचा ‘ऑपरेशन महादेव’ या नावावर अधिक तीव्र व कडवट टीका करण्यात आल्याचे दिसून येते. यामागे सहज धार्मिक धुराळा सुद्धा उडविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय होती? यासाठी कुणी विशेष प्रयत्न केले नाही. त्यामुळेच यासंदर्भातील वस्तुस्थिती मुळातून तपासणे गरजेचे ठरते.

मुळात ‘ऑपरेशन महादेव’ या नांवासह करण्यात आलेल्या मोहिमेची पार्श्वभूमी म्हणजे ज्या क्षेत्र अथवा भौगोलिक परिसरात भारतीय सेना व काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्धची मोहिम राबविली तो परिसर दाचीगामचे जंगल व ‘महादेव’ नामक पठार परिसरात आहे. हा टापू अमरनाथ यात्रा मार्गावर असल्याने त्यादृष्टीने पण त्यांचा महादेव शब्दाशी भावनिक-परंपरागत स्वरुपातील संबंध होताच.

याच कारणाने स्थानिक नागरिकच नव्हे तर प्रशासन-पोलिसांपासून सेना-सैनिकांपर्यंत सर्वजण या टापूला महादेव परिसर म्हणूनच स्वाभाविकपणे ओळखतात हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. याशिवाय परंपरागतरित्या दरवर्षी अमरनाथ यात्रेला संरक्षण पुरविणाऱ्या सैनिकांसाठी हा परिसर म्हणजे भाविकांच्या महादेव यात्रेला स्वाभाविकपणे या महत्त्वाच्या कामगिरीला ऑपरेशन महादेव हे नाव दिले. निवडक माध्यमवीर व टीकाकारांनी मात्र मोहिमेला ‘ऑपरेशन महादेव’ हे नाव दिल्याप्रकरणी आपापल्यापरीने आकांडतांडव केलेच.

प्रत्यक्षात भारतीय सैन्यदलांसह देशाच्या संरक्षण विषयक कामगिरी वा मोहिमेला प्रेरणादायी व साजेसे शीर्षक वजा नाव देण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वीपासूनच चालत आली आहे. यासंदर्भात थोडक्यात व उदाहरणांसह सांगायचे म्हणजे भोपाळस्थित सैन्यदलाच्या युद्धप्रसंगी आघाडीसह काम करणाऱ्या विभागाच्या मुख्य महत्त्वाच्या सराव-प्रशिक्षण उपक्रमांना ‘सुदर्शन चक्र’ हे नाव दिले जाते. यामागे सैन्यदलाची गतिमानता, ताकत, शक्ती व मुख्य म्हणजे विषयी संरक्षण सिद्धतेची भावना नेहमीच प्रतीत व सिद्ध झाली आहे.

वेलिंग्टन येथील सेनादलाच्या तिन्ही विभागातील विशेष युद्धविषयक  प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘कुरुक्षेत्र’ असे संबोधिले जाते. वर्षानुवर्षे ही पद्धत प्रचलित आहे व विशेष स्फूर्तीसह सैन्य अधिकारी आपले प्रशिक्षण पूर्ण करतात. अन्य उदाहरण म्हणजे विशेषत: गढवाल रायफल्समध्ये प्रामुख्याने उत्तराखंडमधून दाखल होणाऱ्या सैन्य तुकडीची देवता वजा प्रेरणास्त्रोत आहे भगवान बद्री विशाल व त्यांची विजय घोषणा आहे ‘बद्री विशाल लाल की जय.’ यामध्ये कुठलाही धार्मिक मुद्दा नसून विजयी पहाडी परंपरेचा तो आविष्कार मात्र आहे.

गढवाल रायफल्सशी संबंधितच एक अन्य अलिखित व महत्त्वाची शौर्य परंपरा म्हणजे पलटणीतील प्रत्येक सैनिक मोहिमेच्या प्रत्येक अखेरच्या व निर्णायक टप्प्यात जिवाची बाजी लावून व शर्थीने लढण्यासाठी ‘बद्री विशाल लाल की जय’ ही विजय घोषणा त्वेशाने व त्रिवार म्हणून शत्रूवर विजय मिळविण्यासाठी तुटून पडतात.

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अथवा ‘हरहर महादेव’ या सैन्य घोषणा तर सैनिकांसह सर्वांसाठी सदाकाळ स्फूर्तीदायी आहेत. भारतीय सैन्याने श्रीलंकेत पार पाडलेल्या यशस्वी मोहिमेचे नाव तर ‘ऑपरेशन समशेर’ होतं. या पर्शियन शब्दाचा संदर्भ तलवारीशी होता व त्यातून शौर्य-धैर्याची सैनिकी प्रेरणातील युद्धातील यशासाठी प्राप्ती होते हा पण इतिहास आहे.

त्यामुळेच भारतीय सैन्यदलातील विजयी घोषणांकडे विजय आणि विजयी भावनेच्या प्रेरणेसहच बघायला हवे. त्यामध्ये धार्मिक भावना वा टीकात्मक दृष्टीसह पाहणे योग्य नाही. भारतीय सैन्यदलाने नेमकी हीच एकी आणि एकतेची भावना कृतिशीलपणे सिद्ध केली आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.