मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला 43 पदके
वृत्तसंस्था / अमान (जॉर्डन)
येथे झालेल्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई कनिष्टांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने 15 सुवर्ण, 6 रौप्य आणि 22 कांस्य अशी एकूण 43 पदकांची कमाई करत पदक तक्त्यात दुसरे स्थान पटकाविले. कझाकस्थानने पदक तक्त्यात पहिले तर उझ्बेकस्थानने तिसरे स्थान घेतले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय स्पर्धकांनी चार सुवर्णपदकांची कमाई केली.
सदर स्पर्धा मुले आणि मुली अशा दोन गटामध्ये खेळविण्यात आली होती. मुलींच्या 17 वर्षांखालील वयोगटात शेवटच्या दिवशी भारताने 4 सुवर्णपदकांची कमाई केली. खुशी चंदने 46 किलो वजन गटात मंगोलीयाच्या अल्टेनगॅडेसचा 3-2 अशा गुण फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. 50 किलो वजन गटात अहाना शर्माने तसेच 54 किलो गटात जेनतने आणि उझ्बेकच्या स्पर्धकावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवित सुवर्णपदके घेतली. 80 किलो वरील वजन गटात अनिष्ठाने जॉर्डनच्या जेनाचा पराभव करत भारताला चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले.
मुलांच्या 17 वर्षांखालील वयोगटात 80 किलो गटात भारताच्या देवानीशने रौप्य पदक मिळविले. सुवर्णपदकासाठीच्या लढतीत कझाकस्थानच्या रुस्तमबेकने त्याचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. मुलांच्या 17 वर्षांखालील वयोगटात स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताला 1 रौप्य आणि 6 कांस्य पदके मिळाली. 60 किलो गटात सिमरनजित कौर आणि 63 किलो गटात हर्षिका यांनी मुलींच्या 17 वर्षांखालील वयोगटात प्रत्येकी 1 रौप्य पदक पटकाविले. 17 वर्षांखालील मुलींच्या गटात भारताने 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य पदके मिळविली.