भारताला मिळणार ‘स्टील्थ’ युद्धनौका
रशियात होत आहे बांधणी, महिन्याअखेर समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताला दुसरी अत्याधुनिक ‘स्टील्थ’ युद्धनौका मे महिन्याच्या अखेरपर्यंत मिळणार आहे. या युद्धनौकेची बांधणी रशियात होत असून ती पूर्णत्वास आली आहे. ही युद्धनौका ‘आयएनएस तमल’ या नावाची असून ती शत्रूच्या रडारवर न दिसणारी आहे. या युद्धनौकेत अत्याधुनिक ब्राम्होस क्षेपणास्त्रे आणि सेन्सर्स बसविण्यात आले आहेत. या समावेशानंतर भारतीय नौदलाचे बळ वाढणार आहे.
अशाच प्रकारची आणखी एक युद्धनौका भारतीय नौदलात यापूर्वीच समाविष्ट झाली असून ती ‘आयएनएस तुशिल’ या नावाने ओळखली जात आहे. अशा प्रकारे लवकरच भारताच्या नौदलात अशा दोन युद्धनौका असतील. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणावग्रस्त झाले असून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या पाश्वभूमीवर या अत्याधुनिक नौकांचा समावेश भारताच्या नौदलात होणे महत्वाचे मानले जात आहे.
तीन हजार नऊशे टन वजन
आयएनएस तमल या युद्धनौकेचे वजन 3,900 टन असून ही युद्धनौका भारताला या महिन्याच्या अखेरीपर्यंत देण्यात येणार आहे. या नौकेची सर्व बांधणी पूर्ण झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले असून, महत्वाची परीक्षणे करण्याचे काम होत आहे. ते पूर्ण झाल्यानंतर ही नौका भारताच्या नौदलात समाविष्ट होणार आहे. भारताने 2016 मध्येच रशियाशी एक सर्वंकष करार केला होता. त्यानुसार भारताला अशा चार युद्धनौका पुरविल्या जाणार आहेत. हा करार 13 हजार कोटी रुपयांचा आहे. या चार नौकांपैकी एक नौका भारताला मिळाली आहे. तर दुसरी येत्या तीन आठवड्यांमध्ये मिळणार आहे. अन्य दोन नौकाही लवकरच मिळणार आहेत. या चार नौकांपैकी दोन नौका भारतात तर दोन नौका रशियात बांधल्या जात आहेत. 14 फेब्रुवारीलाच आयएसएस तुशिल ही नौका मिळाली आहे. आणखी दोन याच प्रकारच्या युद्धनौका सज्ज होत आहेत, अशी माहिती आहे.
बहुउद्देशीय युद्धनौका
या नौका तलवार श्रेणीतील असून त्या केवळ समुद्रच नव्हे, तर भूमी आणि आकाश या तीनही युद्धक्षेत्रांमध्ये मारा करु शकतात. जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळविलेले ब्राम्होस हे क्षेपणास्त्र या नौकांवरुन डागले जाणार आहे. याखेरीज अन्यप्रकारचा शस्त्रसंभारही या या नौकांवर असून त्या शत्रूच्या कोणत्याही आव्हानाला चिरडण्याची क्षमता असणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन केले गेले आहे. पाकिस्तानकडे अशा युद्धनौका नाहीत, असेही बोलले जाते. त्यामुळे नौदलाच्या क्षमतेसंदर्भात भारत पाकिस्तानच्या बराच पुढे आहे, असेही प्रतिपादन केले जाते.
नौकांवरची शस्त्रे कोणती...
या नौकांवर ब्राम्होस ही स्वनातीत वेगाची क्रूझ क्षेपणास्त्रे, (ज्यांचा पल्ला 450 किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे) असतील. याखेरीच पाणबुडीविरोधी पाणसुरुंग (टोर्पेडो), शत्रूच्या नौकांची हानी करणारे अग्निबाण, मोठ्या पल्ल्याच्या गन्स, तोफा आणि इतर आवश्यक शस्त्रे या युद्धनौकांवर बसविण्यात आली आहेत.
वेगातही बेजोड
या युद्धनौकांचा वेग 30 सागरी मैल इतका आहे. या युद्धनौका पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर्ससुद्धा वाहून नेऊ शकतात. तसेच एअरबोर्न अर्ली वॉर्निंग व्यवस्था असणारी हेलिकॉप्टर्सही या नौकांवरुन उ•ाण करु शकतात. ही हेलिकॉप्टर्सही रशियाने भारताला दिली आहेत. ती कामोव्ह 28 आणि कामोव्ह 31 अशा नावांची आहेत. या युद्धनौकांवरुन रेडिओ, इनफ्रारेड आणि अॅकोस्टिक स्पेक्ट्रम्स आदी उच्च संपर्क तंत्रज्ञानाची उपकरणे असल्याने त्यांची युद्धक्षमता बेजोड आहे. भारतीय नौदलाच्या उच्च अधिकाऱ्यांनीही या नौकांवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे.