भारत कुठल्याही क्षणी हल्ला करेल!
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री भयभीत
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत कुठल्याही क्षणी हल्ला करणार असल्याचा दावा केला आहे. भारत नियंत्रण रेषेवर कुठल्याही क्षणी सैन्य हल्ला करू शकतो. नरेंद्र मोदींनी राजकीय लाभासाठी पूर्ण क्षेत्राला आण्विक युद्धाच्या स्थितीत लोटले आहे, तसेच पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्ताना प्रांतात भारत दहशतवादाला बळ पुरवित असल्याचा कांगावा आसिफ यांनी केला आहे.
एलओसीवर कुठल्याही क्षणी भारताकडून सैन्य हल्ला होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी सैन्य तयार असून भारताच्या कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आसिफ यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध अधिकच चिघळले आहेत. भारतीय सैन्य एलओसी ओलांडणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. तर ख्वाजा आसिफ यांनी यापूर्वी भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली होती.
भारताला पुरावे द्यावे लागतील : आसिफ
पहलगाम येथील हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी तयार असल्याचे पाकिस्तानने यापूर्वीच स्पष्ट पेले आहे. भारताकडे कुठलेही पुरावे असल्यास त्याने जगासमोर सादर करावेत. पाकिस्तानने 2016 आणि 2017 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला पुरावे उपलब्ध केले होते, यात पाकिस्तानातील दहशतवादाला भारत वित्तपुरवठा करत असल्याचा पुरावा सामील होता असा दावा आसिफ यांनी केला आहे.
10 मे रोजी होणार हल्ला
याचदरम्यान दिल्लीत पाकिस्तानचे माजी राजदूत राहिलेले अब्दुल बासित यांनी भारत 10 किंवा 11 मे रोजी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असा दावा केला अहे. भारत 10-11 मे रोजी पाकिस्तानच्या विरोधात मर्यादित सैन्य कारवाई करू शकतो असे बासित यांनी ट्विट करत म्हटले आहे.