कॅनडाकडून भारताला आरोपीसारखी वागणूक
भारतीय राजदूतांकडून नाराजी व्यक्त : निज्जर प्रकरणी चौकशीशिवाय ठरविले दोषी
वृत्तसंस्था/ ओटावा
खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केल्यापासून कॅनडा आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. निज्जरच्या हत्येची चौकशी न करताच भारताला दोषी ठरविण्यात आले होते. हेच कॅनडातील कायद्याचे राज्य आहे का? आम्हाला आरोपींसारखे वागवून कॅनडा आम्हालाच चौकशीत सहकार्य करण्यास सांगत आहे. कॅनडाकडे पुरावे असल्यास ते सादर करावेत अशी भूमिका भारताने नेहमीच मांडली असल्याचे भारतीय राजदूत संजय वर्मा यांनी सीटीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट पेले आहे.
भारत-कॅनडा संबंध सप्टेंबरच्या तुलनेत आता पूर्वीपेक्षा चांगले झाले आहेत. काही कॅनेडियन नागरिक विदेशी भूमीचा वापर भारतात दहशतवाद फैलावण्यासाठी करत आहेत हीच भारताची सर्वात मोठी चिंता आहे. भारतीय मुत्सद्दी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांची सुरक्षा हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचे वर्मा यांनी म्हटले आहे.
खलिस्तानी दहशतवादी मोकाट
भारत सरकारने खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात अनेक दस्तऐवज कॅनडाला सोपविले आहेत. भारत तसेच कॅनडात करण्यात आलेल्या गुन्ह्dयांसंबंधी हे पुरावे आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले आणि मग आमच्या एका मुत्सद्दी अधिकाऱ्याला देशाबाहेर काढले तेव्हा भारतासाठी ही मोठी गोष्ट होती. याचमुळे आम्ही याला प्रत्युत्तर देत कॅनेडियन मुत्सद्दी अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्याचे राजदूत वर्मा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान ट्रुडो यांच्या वक्तव्यामुळे भारत सरकारचा दृष्टीकोन प्रभावित झाला. कॅनडाच्या आरोपांचा आमच्या भावनांवर मोठा प्रभाव पडला आहे. मुत्सद्दी अधिकाऱ्यांना देशाबाहेर काढण्याच्या निर्णयामागे याच भावना कारणीभूत होत्या असे त्यांनी नमूद केले आहे.
भारत आणि कॅनडा हे देश संबंध सुधारण्यासाठी आणि परस्परांच्या देशामध्ये स्वत:ची राजनयिक उपस्थिती वाढविण्यावर काम करत आहेत. आमचे संबंध आता सुधारत आहेत. भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी ई&-व्हिसा सेवा देखील सुरू केली असल्याचे वर्मा यांनी कार्यक्रमात सांगितले आहे.
कॅनडातील उच्चाधिकाऱ्यांकडून निज्जरच्या हत्येचा आरोप भारताच्या माथी मारण्याचा आदेश पूर्वीच देण्यात आला होता. याचबरोबर पंतप्रधान ट्रुडो यांच्या वक्तव्याचा देखील या चौकशीवर नकारात्मक प्रभाव पडला असल्याचा दावा वर्मा यांनी केला आहे.
राजनयिकांचे संभाषण रिकॉर्ड करणे गैर
राजनयिक अधिकाऱ्यांमधील संभाषण न्यायालय किंवा सार्वजनिक स्वरुपात पुराव्याप्रमाणे वापरले जाऊ शकत नाही. हा प्रकार आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. कॅनडा बेकायदेशीर वायरटेप आणि पुराव्यांबद्दल बोलत आहे. कॅनडाला हे पुरावे कसे मिळाले हे आम्ही पाहू इच्छितो. या टेपमधील संभाषण राजनयिकांच्या आवाजाची नक्कल करून निर्माण केलेले असू शकते असे वर्मा यांनी म्हटले आहे.