भारत-थायलंड मित्रत्वाचा सामना जूनमध्ये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या 4 जून रोजी भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण सामना थायलंडविरुद्ध त्यांच्याच देशात होणार असल्याचे अ.भा. फुटबॉल फेडरेशनने बुधवारी जाहीर केले.
भारतीय संघ सध्या एएफसी आशियाई चषक 2027 पात्रता स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत खेळत आहे. थम्मासात स्टेडियमवर होणारा हा मैत्रिपूर्ण सामना भारताच्या तयारीसाठी उपयुक्त सामना ठरणार आहे. कारण पात्रता स्पर्धेचा पुढील सामना 10 जून रोजी हाँगकाँग चायनाविरुद्ध होणार आहे. फिफा मानांकनात भारत सध्या 127 व्या तर थायलंड 99 व्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांत आतापर्यंत 26 वेळा गाठ पडली असून भारताने 7 तर थायलंडने 12 सामने जिंकले आहेत. उर्वरित सात सामने अनिर्णीत राहिले आहेत.
भारताचे सराव शिबीर 18 मे पासून कोलकाता येथे सुरू होईल आणि 29 मे रोजी भारतीय संघ थायलंडला प्रयाण करेल. मैत्रिपूर्ण लढतीनंतर तेथूनच भारतीय संघा हाँगकाँगला रवाना होईल. तेथे हा संघ आशियाई चषक पात्रता लढतीची तयारी करेल तसेच वातावरणाशी जुळवून घेण्याचाही प्रयत्न करेल. गट क मध्ये बांगलादेश व सिंगापूर हे अन्य दोन संघ आहेत. या गटातील चारही संघांनी प्रत्येकी एक गुण मिळविला आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील शिलाँगमध्ये झालेला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला तर सिंगापूर व हाँगकाँग यांच्यात 25 मार्च रोजी झालेला सामनाही अनिर्णीत राहिला होता.