भारताकडून पुन्हा ‘मेटा’ कंपनीला समन्स
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक फेसबुक पोस्ट दिसेनाशी झाल्याच्या प्रकरणी पुन्हा एकदा भारताने ‘मेटा’ या कंपनीला समन्स पाठविले आहे. केंद्र सरकारने या कंपनीला काही महत्वाचे प्रश्न विचारले असून त्यांची समर्पक उत्तरे मिळण्याची भारत सरकारची अपेक्षा आहे. हे प्रश्न फेसबुकच्या अल्गोरिदमिक पक्षपात, कंटेंट मॉडरेशनची पद्धती तसेच सामाजिक व्यवस्था राखण्यात मेटाची भूमिका यांच्या संदर्भात आहेत. संसदेच्या माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीसमोर उपस्थित राहून कंपनीने या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, अशी भारताने कंपनीकडे मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट अचानक नाहीशी झाल्यानंतर भारताने मेटाकडे तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर कंपनीने ही पोस्ट त्वरित पुन्हा प्रसारित केली होती. तथापि, तो पर्यंत बराच वेळ गेला हाता. त्यानंतर झाल्या प्रकारासंबंधी कंपनीने भारत सरकारकडे क्षमायाचनाही केली आहे. ही पोस्ट केवळ काही तांत्रिक अडचणीमुळे दिसेनाही झाली होती. पण हा प्रकार हेतुपुरस्सर केलेला नव्हता, तर चुकून झाला होता, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले होते. तथापि, भारताला हे स्पष्टीकरण पुरेसे समाधानकारक वाटत नसल्याचे कंपनीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेण्यासाठी भारताने पुन्हा या कंपनीला उपस्थित होण्याची सूचना केली आहे. कंपनीने या संबंधात अद्याप प्रतिक्रिया व्यक्त पेलेली नाही.