भारताचा डोंगरी रडार खरेदीसाठी करार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने भारताच्याच सार्वजनिक क्षेत्रातील ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीशी डोंगरी रडार खरेदी करण्याविषयी करार केला आहे. मंगळवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार 1 हजार 950 कोटी रुपयांचा आहे. या रडार्समुळे भारताच्या सीमा अधिक सुरक्षित होणार आहेत, असे स्पष्ट केले गेले.
या रडार्सचा उपयोग कमी उंचीवरुन उडणारे ड्रोन्स किंवा इतर अस्त्रे यांना शोधण्यासाठी होणार आहे. शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स, क्षेपणास्त्रे आणि अग्नीबाण या रडार्सच्या साहाय्याने शोधणे आणि आकाशातच नष्ट करणे शक्य होणार आहे. आधुनिक युद्धतंत्रात ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या रडार्सची अत्यंत आवश्यकता आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने ही आवश्यकता भारतात पूर्ण केली असल्याने, भारताच्या आत्मनिर्भरतेच्या अभियानालाही मोठे बळ मिळाले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ही रडार्स वजनाने कमी असल्याने ती त्वरीत एका स्थानाहून अन्य स्थानी नेता येतात. तसेच त्यांचे पॅकिंग आणि स्थापनाही सुलभपणे करता येते.
भूदलाची क्षमता वाढणार
या रडार्समुळे भूदलाच्या आक्रमण आणि संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. अनेक वर्षांपासून भूदलाला अशा रडार्सची आवश्यकता होती. ती आता लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या धोरणालाही या रडार निर्मितीमुळे बळ मिळणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.